मुरुड | प्रतिनिधी
मुरुड तालुक्यातील नादगाव परिसरात मंगळवारी (दि. २ जून) रात्री सुमारे ८.३० वाजण्याच्या सुमारास अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावली. दिवसभराच्या उकाड्यानंतर झालेल्या या पावसामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला असला, तरी अचानक आलेल्या सरींमुळे नागरिकांसह व्यापारी आणि शेतकरी वर्गाची चांगलीच धावपळ उडाली.
सायंकाळपासूनच परिसरात ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू झाला. काही ठिकाणी वाऱ्याचा वेगही वाढल्याने रस्त्यांवर धावपळीचे वातावरण निर्माण झाले. घराबाहेर वाळत घातलेले धान्य, कपडे आणि इतर साहित्य सुरक्षित ठिकाणी हलविण्यासाठी नागरिकांची लगबग सुरू होती.
या अवकाळी पावसामुळे शेतकरी वर्गातही चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. काढणीस आलेली पिके, भाजीपाला तसेच साठवलेले कृषी उत्पादन यांना नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
हवामान विभागाने यापूर्वीच कोकण किनारपट्टीसह राज्यातील अनेक भागांमध्ये पूर्वमान्सून सरी, मेघगर्जना आणि ताशी ५० ते ६० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तविली होती. त्यानुसार नादगाव परिसरातही पावसाने हजेरी लावली.
पावसानंतर वातावरणात सुखद गारवा निर्माण झाला असून उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे. हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, पुढील काही दिवस कोकणासह राज्यातील विविध भागांत मेघगर्जनेसह पाऊस आणि जोरदार वाऱ्यांची शक्यता कायम राहणार आहे.
– प्रतिनिधी, मुरुड











