धाराशिव, दि. २ जून : उस्मानाबाद जिल्हा खाजगी शिक्षण संस्था चालक संघटनेची महत्त्वपूर्ण बैठक मंगळवारी (दि. २ जून २०२६) दुपारी १२.३० वाजता के. टी. पाटील डी. फार्मसी कॉलेज येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ अशोकराव मोहेकर होते. यावेळी खाजगी शिक्षण संस्था चालक संघटनेचे अध्यक्ष सुधीर पाटील, अशोकराव पवार, दत्ता बंडगर, धनंजय पाटील तसेच टिकले गुरुजी यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक टिकले सर यांनी केले. त्यांनी शिक्षण संस्था चालविताना संस्थाचालकांसमोर उभ्या राहणाऱ्या विविध अडचणी, समस्या आणि आव्हानांचा आढावा घेतला. तसेच शासनस्तरावर आणि न्यायालयीन मार्गाने या समस्यांवर उपाययोजना करण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
बैठकीत शिक्षण संस्थांसमोरील विविध प्रश्नांवर उपस्थित संस्थाचालकांनी आपली मते मांडली. यामध्ये सरवदे सर, पांडुरंग लाटे सर, शिंदे सर, मुळे मॅडम यांच्यासह अनेक मान्यवरांनी सहभाग घेतला.
यावेळी संघटनेचे अध्यक्ष सुधीर पाटील यांनी आपल्या मनोगतात शिक्षक भरती प्रक्रियेतील पोर्टलमधील त्रुटी दूर करण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करण्यात येणार असल्याचे सांगितले. आवश्यकतेनुसार न्यायालयीन लढा उभारण्याची तयारीही संघटनेने दर्शविली.
शिपाई पदे रद्द करण्याचा तसेच सेवानिवृत्तीनंतर नवीन भरतीवर घालण्यात आलेल्या निर्बंधांचा निषेध व्यक्त करताना, ही पदे संस्थेच्या दैनंदिन कामकाजासाठी अत्यावश्यक असल्याने शासनाचा निर्णय न्यायालयात आव्हान देण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला.
तसेच संस्थांमधील सेवानिवृत्त लिपिकांच्या जागी नवीन भरतीस असलेली बंदी उठवण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्यात येणार असून, त्याबाबतही आवश्यक असल्यास न्यायालयीन याचिका दाखल करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
संच मान्यता प्रक्रियेमधील विद्यार्थी संख्येच्या निकषांबाबत शासनाने घातलेल्या अन्यायकारक अटी व शर्ती, तसेच १५ मार्च २०२४ च्या शासन निर्णयाविरोधात न्यायालयात जाण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
याशिवाय, कनिष्ठ महाविद्यालयांच्या २०२५-२६ च्या ऑनलाईन संच मान्यता प्रक्रियेमध्ये विद्यार्थी संख्या, वर्कलोड, वेतनेतर अनुदान यांसारख्या बाबींमध्ये संस्थांवर अन्याय होत असल्याचा आरोप करण्यात आला. या संदर्भात संघटना न्यायालयीन लढा उभारणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.
जिल्ह्यातील कायम शब्द काढलेल्या परंतु अद्याप मूल्यांकन न झालेल्या १२ प्राथमिक शाळांना स्वयंअर्थसहाय्यित करण्याचा अथवा बंद करण्याचा प्रयत्न होत असल्याबद्दल तीव्र चिंता व्यक्त करण्यात आली. या शाळांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची तयारी संघटनेने दर्शविली.
बैठकीत शासनाच्या विविध धोरणांविरोधात टप्प्याटप्प्याने आंदोलन उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच धाराशिव येथे संघटनेचे स्वतंत्र कार्यालय सुरू करण्याचा मानसही व्यक्त करण्यात आला.
जिल्हास्तरीय शैक्षणिक प्रश्नांच्या न्यायालयीन लढ्यासाठी सात सदस्यीय तज्ज्ञ समिती स्थापन करण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. ही समिती विविध प्रश्नांवर मार्गदर्शन करून संस्थांना आवश्यक कायदेशीर मदत उपलब्ध करून देणार आहे.
अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात आणि मोठ्या संख्येने उपस्थित संस्थाचालकांच्या सहभागातून ही बैठक पार पडली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा सचिव लहूराज लोमटे यांनी केले, तर आभार प्रदर्शन मार्गदर्शक ॲड. वसंतरावजी मडके यांनी केले.











