उंबरी बाळापूर (ता. संगमनेर) : उंबरी बाळापूर येथील प्रवरा डाव्या कॅनॉलच्या कडेला असलेले पडण्याच्या अवस्थेतील गोडबाभळीचे झाड हटविण्याबाबत गेल्या तीन वर्षांपासून पाठपुरावा करूनही कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नसल्याचा आरोप अर्जदार भागवत लिंबाजी खेमनर यांनी केला आहे. वारंवार पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती देऊनही या गंभीर विषयाकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, कॅनॉललगत असलेले हे झाड एका बाजूला मोठ्या प्रमाणात झुकले असून ते कधीही कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे परिसरातील नागरिक, शेतकरी तसेच वाहतूक करणाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक वेळा तक्रारी करूनही संबंधित विभागाने प्रत्यक्ष पाहणी करून झाड हटविण्याची कार्यवाही केलेली नसल्याचा आरोप करण्यात येत आहे.
दरम्यान, ज्या गोडबाभळीच्या झाडाबाबत तक्रारी करण्यात येत आहेत, त्याच परिसरातील चंदनाचे झाड काही व्यक्तींनी परवानगी न घेता तोडल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या घटनेची माहिती संबंधित विभागांना देण्यात आली असतानाही कोणतीही कायदेशीर कारवाई झालेली नसल्याचा दावा अर्जदाराने केला आहे. तसेच काही विभागीय कर्मचाऱ्यांनी आर्थिक व्यवहार करून हे प्रकरण दडपल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे.
याहूनही गंभीर बाब म्हणजे, ज्या व्यक्तींवर चंदन वृक्षतोडीचा आरोप आहे, त्याच व्यक्ती आता वन विभागाच्या अधिकाऱ्यांना झाड हटविण्याच्या कामात अडथळे निर्माण करत असल्याचे सांगितले जात आहे. काही वेळा आत्महत्येच्या धमक्या देऊन शासकीय कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे.
जलसंधारण मंत्र्यांच्या जनता दरबारात मांडणार होते प्रश्न
अर्जदार भागवत खेमनर यांनी सांगितले की, सुमारे सहा महिन्यांपूर्वी राज्याचे जलसंधारण मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रवरानगर येथे आयोजित केलेल्या जनता दरबारात हा विषय मांडण्याचा त्यांचा मानस होता. मात्र, त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या काही पाटबंधारे कर्मचाऱ्यांनी त्यांची भेट घेऊन संबंधित झाड लवकरच काढण्यात येईल, अशी ग्वाही दिली होती. त्यामुळे त्यांनी जनता दरबारात तक्रार मांडली नाही. परंतु त्यानंतरही आजपर्यंत कोणतीही कार्यवाही झालेली नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
निष्पक्ष चौकशीची मागणी
धोकादायक गोडबाबळीचे झाड तातडीने हटवावे, चंदन वृक्षतोड प्रकरणाची सखोल चौकशी करावी तसेच दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी भागवत लिंबाजी खेमनर यांनी प्रशासनाकडे केली आहे. या प्रकरणामुळे संबंधित विभागांच्या कार्यपद्धतीबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत.











