मारेगाव | प्रतिनिधी
मारेगाव शहरातील प्रमुख मार्केट लाईन परिसरात तसेच पोलीस स्टेशनलगत नगरपंचायतीमार्फत उभारण्यात आलेल्या पसायदान गृहाची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाल्याचे चित्र समोर आले आहे. नागरिकांच्या सोयीसाठी उभारण्यात आलेल्या या सार्वजनिक सुविधेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
तालुक्यातील विविध गावांमधून नागरिक बँक, तहसील कार्यालय, पंचायत समिती आदी शासकीय कामांसाठी मारेगाव येथे येत असतात. अशा नागरिकांना स्वच्छ व सुरक्षित सुविधा उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने नगरपंचायतीने पसायदान गृहाची उभारणी केली होती. मात्र सध्या या ठिकाणी अस्वच्छता, तुटफूट आणि देखभालीचा अभाव स्पष्टपणे दिसून येत आहे.
पसायदान गृहातील स्वच्छतागृहांच्या दरवाजांना मोठी भगदाडे पडली असून परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. काही ठिकाणी मद्यपान करून टाकलेल्या रिकाम्या बाटल्याही आढळून येत आहेत. त्यामुळे नागरिकांना या सुविधेचा वापर करताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
नागरिकांच्या म्हणण्यानुसार, नगरपंचायतीकडे कराच्या स्वरूपात लाखो रुपयांचा महसूल जमा होत असताना सार्वजनिक सुविधांच्या देखभालीकडे दुर्लक्ष का केले जात आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सार्वजनिक मालमत्तेची योग्य देखभाल करणे ही प्रशासनाची जबाबदारी असून त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही नागरिकांनी केला आहे.
या पार्श्वभूमीवर नगरपंचायतीने तातडीने दखल घेऊन पसायदान गृहाची स्वच्छता, दुरुस्ती आणि सुरक्षा व्यवस्था सुधारावी, अशी मागणी तालुक्यातील नागरिकांकडून होत आहे. सार्वजनिक सुविधांचा दर्जा राखण्यासाठी प्रशासनाने त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.









