तिलारी | प्रतिनिधी | दि. ६ जून
जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून तिलारी राखीव संवर्धन क्षेत्रात ‘पिक प्लास्टिक अँड क्लीन रिव्हर’ या विशेष स्वच्छता अभियानाचे उत्साहात आयोजन करण्यात आले. पर्यावरण संवर्धन आणि नदी परिसर स्वच्छ ठेवण्याचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
मा. उपवनसंरक्षक सावंतवाडी मिलिश शर्मा, मा. सहाय्यक वनसंरक्षक सावंतवाडी वैभव बोराटे तसेच मा. वनक्षेत्रपाल दोडामार्ग संभाजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली.
वनश्री फाउंडेशनचे अध्यक्ष तथा मानद वन्यजीव रक्षक संजय सावंत यांच्या उपस्थितीत तिलारी राखीव संवर्धन क्षेत्राच्या मुख्य कमानीपासून सुमारे दीड किलोमीटर परिसरात स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली. या मोहिमेदरम्यान सुमारे एक हजाराहून अधिक प्लास्टिक व काचेच्या बाटल्या तसेच विविध प्रकारचा प्लास्टिक कचरा गोळा करून परिसर स्वच्छ करण्यात आला.
नदी व जंगल परिसर प्लास्टिकमुक्त ठेवण्याबरोबरच पर्यावरण संरक्षणाबाबत जनजागृती करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. उपस्थितांनी पर्यावरण रक्षणाची सामूहिक जबाबदारी स्वीकारत परिसर स्वच्छ ठेवण्याचा संकल्पही केला.
या मोहिमेत वनरक्षक अनिल राख (हेवाळे), सचिन पवार (त. ना. कोनाळ), शुभम वारके (बांबर्डे), छाया लोहार (त. ना. कोनाळ), श्रीमंत कदम (त. ना. कोनाळ), खोक्रलचे सरपंच देवा शेटकर, गौरेश राणे, तसेच कॅम्प सदस्य, दोडामार्ग तालुक्यातील युवा तरुण-तरुणी आणि लहान मुलांनी उत्साहाने सहभाग नोंदविला.
पर्यावरण संवर्धनासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज अधोरेखित करणारा हा उपक्रम तिलारी परिसरात प्रेरणादायी ठरला असून, स्वच्छ आणि हरित पर्यावरणासाठी अशा मोहिमा सातत्याने राबविण्याची आवश्यकता यावेळी व्यक्त करण्यात आली.









