श्रीरामपूर | प्रतिनिधी
श्रीरामपूर शहरात सोशल मीडियावर पाकिस्तानशी संबंधित रील्स पाहून त्यावर आक्षेपार्ह प्रतिक्रिया पोस्ट केल्याच्या संशयावरून महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) काही तरुणांची चौकशी केल्याची माहिती समोर आली आहे. ही कारवाई मुंबई, नाशिक, धुळे आणि नगर येथील एटीएसच्या संयुक्त पथकाने केल्याचे समजते.
मिळालेल्या माहितीनुसार, सोशल मीडियावरील देशविरोधी अथवा संशयास्पद ऑनलाइन हालचालींवर लक्ष ठेवणाऱ्या एटीएसच्या सायबर सेलच्या तपासातून ही बाब निदर्शनास आली. त्यानंतर संबंधित व्यक्तींची पडताळणी आणि चौकशी करण्यासाठी विशेष पथक श्रीरामपूरमध्ये दाखल झाले.
ही चौकशी अत्यंत गोपनीय पद्धतीने पार पडल्याचे सांगितले जात असून, स्थानिक पोलिसांनाही याबाबत पूर्वकल्पना नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. सोशल मीडियावर प्रसारित होणाऱ्या देशविरोधी किंवा संशयास्पद आशयाच्या पोस्ट, प्रतिक्रिया आणि डिजिटल व्यवहारांची पडताळणी करणे हा या कारवाईमागील प्रमुख उद्देश असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, या प्रकरणाबाबत अधिकृत स्तरावर कोणतीही सविस्तर माहिती जाहीर करण्यात आलेली नसून, संबंधित यंत्रणांकडून पुढील तपास सुरू असल्याचे समजते. प्रशासनाकडून यासंदर्भात अधिकृत खुलासा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सायबर माध्यमांचा वापर करताना नागरिकांनी जबाबदारीने व कायद्याच्या चौकटीत राहून वर्तन करावे, असे आवाहन यापूर्वीही विविध सुरक्षा यंत्रणांकडून करण्यात आले आहे.









