पंढरपूर | प्रतिनिधी
पंढरपूर तालुक्यातील शेतकरी सध्या नैसर्गिक संकटांसोबतच अनियमित वीजपुरवठ्याच्या समस्येलाही सामोरे जात असून, त्यामुळे शेतीची कामे मोठ्या प्रमाणावर प्रभावित होत आहेत. विशेषतः चिलाईवाडी (ता. पंढरपूर) येथील शेतकऱ्यांनी महावितरणच्या कारभाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, गेल्या १४ वर्षांपासून चिलाईवाडी गावाला एक दिवसाआड थ्री-फेज वीजपुरवठा दिला जात आहे. सध्या केवळ सहा तास थ्री-फेज वीज उपलब्ध होत असून तोही एक दिवसाआड मिळत असल्याने शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे.
याशिवाय सिंगल-फेज वीजपुरवठादेखील सतत खंडित होत असल्याची तक्रार आहे. वीज कधी येते आणि कधी जाते याचा कोणताही ठराविक वेळ नसल्याने शेतकऱ्यांना मोटारी चालविणे, पिकांना पाणी देणे आणि इतर शेतीकामांचे नियोजन करणे कठीण झाले आहे.
सध्या गावात प्रामुख्याने रात्री १२ ते सकाळी ८ वाजेपर्यंतच थ्री-फेज वीजपुरवठा मिळत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे रात्रभर जागून पाणी देण्याची वेळ शेतकऱ्यांवर येत असून त्यांच्या आरोग्यावरही त्याचा परिणाम होत आहे.
आधीच अवकाळी हवामान, पावसाची अनिश्चितता आणि वाढता उत्पादन खर्च यामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांवर आता वीजटंचाईचे दुहेरी संकट ओढवले आहे. नियमित आणि पुरेसा वीजपुरवठा मिळावा, तसेच चिलाईवाडीसह परिसरातील गावांचा वीजप्रश्न कायमस्वरूपी सोडवावा, अशी मागणी शेतकरी आणि ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
महावितरण प्रशासनाने या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.










