सेलू | प्रतिनिधी
सेलू तालुक्यातील नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर तातडीने उपाययोजना करण्याच्या उद्देशाने वर्धा जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी श्रीमती वानमथी सी. यांच्या उपस्थितीत ‘ग्रामस्थांशी संवाद’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सालई (पेवठ), ता. सेलू, जि. वर्धा येथे उत्साहात पार पडला.
या संवाद कार्यक्रमाद्वारे ग्रामस्थांना त्यांच्या विविध समस्या, अडचणी तसेच विकासकामांबाबतच्या सूचना थेट जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडण्याची संधी उपलब्ध झाली. नागरिकांनी पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य, शिक्षण, महसूल आणि विविध शासकीय योजनांशी संबंधित प्रश्न उपस्थित करत प्रशासनाचे लक्ष वेधले.
तहसीलदार शकुंतला पाराजे आणि गटविकास अधिकारी देवानंद पानबुडे यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. यावेळी शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती देण्यात आली तसेच ग्रामस्थांच्या समस्या ऐकून त्यावर आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले.
ग्रामीण भागातील नागरिक आणि प्रशासन यांच्यात थेट संवाद निर्माण करून शासन सेवा अधिक प्रभावीपणे पोहोचविण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वाचा ठरत असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.
कार्यक्रमास सालई (पेवठ) व परिसरातील गावांतील महिला-पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामस्थांनी आपल्या समस्या मोकळेपणाने मांडल्या, तर जिल्हाधिकाऱ्यांनीही त्या गांभीर्याने ऐकून संबंधित विभागांना आवश्यक सूचना दिल्या.
या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, जिल्हाधिकारी व प्रशासनाच्या या लोकाभिमुख उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात येत आहे.









