शहादा, दि. ५ | प्रतिनिधी
शहादा शहरातील वाढते अतिक्रमण, बेशिस्त पार्किंग, राँग साईड वाहतूक आणि अवजड वाहनांच्या वाढत्या वर्दळीमुळे शहर वाहतूक कोंडीच्या गंभीर समस्येला सामोरे जात आहे. या पार्श्वभूमीवर शहादा नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षा माधवी मकरंद पाटील यांनी मुख्याधिकारी तसेच पोलीस प्रशासनाला स्मरणपत्र देत तातडीने संयुक्त कारवाईची मागणी केली आहे.
यापूर्वी १५ मे रोजी यासंदर्भात पत्र देण्यात आले होते. मात्र, त्यावर कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने उपनगराध्यक्षांनी पुन्हा स्मरणपत्र सादर केले आहे.
शहरातील महात्मा फुले चौक ते श्रेयस हॉस्पिटल, स्टेट बँक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, चार रस्ता ते सोनार गल्ली आणि महात्मा गांधी पुतळा ते बागवान गल्ली या प्रमुख मार्गांवर वाहतुकीची दुरवस्था निर्माण झाली असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले आहे. वन-वे रस्ते असतानाही अनेक वाहनचालक राँग साईडने वाहने चालवत असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे.
याशिवाय, शहरातील मुख्य रस्त्यांवर अवजड वाहनांची वर्दळ सुरूच असल्याने वाहतूक कोंडीत भर पडत आहे. विशेष म्हणजे, नगरपालिका कार्यालयासमोरच नॉनव्हेज आणि अंडाकरी विक्रेत्यांनी व्यवसाय थाटल्यामुळे अस्वच्छता, दुर्गंधी आणि वाहतूक अडथळ्यांची समस्या निर्माण झाली असल्याचेही स्मरणपत्रात नमूद करण्यात आले आहे.
मुख्य रस्त्यांवर आंबे, फळे, चप्पल, थंड पेये तसेच खाद्यपदार्थ विक्रेत्यांच्या हातगाड्यांमुळे नागरिक, महिला, विद्यार्थी आणि रुग्णवाहिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे उपनगराध्यक्षांनी सांगितले.
सुचवलेल्या उपाययोजना
उपनगराध्यक्षा माधवी पाटील यांनी प्रशासनास पुढील उपाययोजना राबविण्याची सूचना केली आहे :
- सर्व हातगाडी व फेरीविक्रेत्यांचे सर्वेक्षण करून त्यांच्यासाठी निश्चित जागा उपलब्ध करून देणे.
- मुख्य रस्त्यांवरील एक बाजू पूर्णपणे मोकळी ठेवून शिस्तबद्ध दुचाकी पार्किंगची व्यवस्था करणे.
- डायमंड कॉर्नर परिसरातील बॅरिकेडिंगचे पुनर्नियोजन करून दुचाकींसाठी पर्यायी मार्ग उपलब्ध करणे.
- पोलीस व नगरपालिका प्रशासनाने संयुक्तपणे राँग साईड वाहतूक आणि अवैध पार्किंगविरोधात दंडात्मक कारवाई करणे.
- अतिक्रमण हटवून सुरक्षित आणि सुरळीत वाहतुकीसाठी विशेष मोहीम राबविणे.
“व्यवसाय करण्याचा अधिकार सर्वांना आहे, मात्र सार्वजनिक रस्ते अडवून नागरिकांना वेठीस धरणे योग्य नाही. आजच प्रभावी उपाययोजना केल्या नाहीत तर भविष्यात गंभीर अपघात घडू शकतात,” असे मत उपनगराध्यक्षा माधवी मकरंद पाटील यांनी व्यक्त केले.
या स्मरणपत्राची प्रत शहादा पोलीस निरीक्षकांनाही पाठविण्यात आली असून, प्रशासनाने याबाबत कोणती कारवाई केली याची लेखी माहिती देण्याची मागणीही करण्यात आली आहे.









