शहादा, दि. ६ | प्रतिनिधी
शिवसेनेचे नंदुरबार जिल्हा संपर्क प्रमुख तथा आमदार चंद्रकांत रघुवंशी यांना आगामी महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेच्या कोट्यातून कॅबिनेट मंत्रीपद देण्यात यावे, अशी आग्रही मागणी शिवसेना संसदीय गटनेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याकडे करण्यात आली आहे.
तळोदा येथे आयोजित करण्यात आलेल्या शिवसंवाद दौऱ्यादरम्यान शिवसेना शहादा तालुका प्रमुख मनलेश जायसवाल यांच्यासह शहादा परिसरातील नागरिकांनी खा. श्रीकांत शिंदे यांना निवेदन सादर करून ही मागणी केली.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, नंदुरबार जिल्हा हा दुर्गम व विकासाच्या मुख्य प्रवाहापासून काहीसा वंचित राहिलेला जिल्हा असून रोजगार, सिंचन आणि पायाभूत सुविधांच्या प्रश्नांवर प्रभावी नेतृत्वाची गरज आहे. या पार्श्वभूमीवर आमदार चंद्रकांत रघुवंशी यांना मंत्रिमंडळात संधी दिल्यास जिल्ह्याच्या विकासाला गती मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
निवेदनानुसार, संयुक्त धुळे-नंदुरबार जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून काम करताना रघुवंशी यांनी दुर्गम भागांमध्ये विकासकामे पोहोचवली. तसेच नंदुरबार नगरपालिकेत विकासाचा नवा आदर्श निर्माण केल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. साक्री आणि अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघांत शिवसेनेचे आमदार निवडून आणण्यातही त्यांच्या रणनीतीचा महत्त्वपूर्ण वाटा असल्याचे नमूद करण्यात आले.
विधान परिषदेत त्यांनी शोषित, वंचित आणि आदिवासी समाजाच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठविल्याचे सांगत, आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच नंदुरबार जिल्ह्यातील पायाभूत सुविधांचा कायापालट करण्यासाठी त्यांचा मंत्रिमंडळात समावेश व्हावा, अशी भावना जिल्हावासीयांनी व्यक्त केली आहे.
निवेदन स्वीकारताना खा. श्रीकांत शिंदे यांच्यासोबत दादाजी भुसे, आनंद परांजपे, भाऊसाहेब चौधरी, राजेंद्र गावित, शिरीष चौधरी, आमश्या पाडवी आणि अविष्कार भुसे उपस्थित होते.
या निवेदनाची प्रत योग्य त्या कार्यवाहीसाठी एकनाथ शिंदे यांच्याकडेही पाठविण्यात आली आहे.
या निवेदनावर शहादा तालुका प्रमुख मनलेश जायसवाल, शहर प्रमुख जितेंद्र जमदाडे, डॉ. राजेंद्र पेंढारकर, जयसिंग ठाकरे, लक्ष्मण पवार, एकनाथ ठाकरे, किरण खर्डे, छायाबाई भामरे, प्रियांका ठाकरे यांच्यासह शहादा परिसरातील अनेक कार्यकर्ते व नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.









