शहादा, दि. ५ | प्रतिनिधी
निसर्ग संवर्धन आणि वृक्षांचे संगोपन हा मानवी अस्तित्वाचा मूलभूत आधार असल्याचा संदेश देत पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या कला, विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयात जागतिक पर्यावरण दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. के. पटेल, उपप्राचार्य प्रा. कल्पना पटेल तसेच पर्यवेक्षक के. एच. नागेश यांच्या हस्ते महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यासोबतच यापूर्वी लावण्यात आलेल्या वृक्षांची पाहणी करून त्यांच्या वाढीचा आढावा घेण्यात आला. गतवर्षी लावलेल्या वृक्षांचे योग्य संगोपन झाल्याचे पाहून उपस्थितांनी समाधान व्यक्त केले.
कार्यक्रमात मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ. एम. के. पटेल यांनी पर्यावरण संरक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले, “वाढते प्रदूषण आणि हवामान बदल ही आजच्या काळातील गंभीर आव्हाने आहेत. निसर्गाचे संवर्धन आणि संगोपन केल्याशिवाय मानवी अस्तित्व सुरक्षित राहू शकत नाही. प्रत्येक नागरिकाने किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प केला पाहिजे.”
या कार्यक्रमास वरिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य एस. डी. सिंदखेडकर, ज्येष्ठ प्राध्यापक विजय डोळे, प्रा. शिवनाथ पटेल, प्रा. भारती पाटील आणि प्रा. चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे नियोजन राष्ट्रीय सेवा योजना (NSS) कार्यक्रम अधिकारी प्रा. उर्मिला पावरा यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संजय विसावे, रईस शेख, दिलवर ठाकरे आणि राहुल बागले यांनी विशेष परिश्रम घेतले.
“वृक्ष लावा, वृक्ष जगवा – पर्यावरणाचे रक्षण करा” या संदेशाचा सामूहिक जयघोष करत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. महाविद्यालयाच्या या पर्यावरणपूरक उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.









