श्रीगोंदे / प्रतिनिधी
महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि उन्हाळ्यातील तीव्र उष्णतेमुळे डाळिंब उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. वाढत्या तापमानामुळे डाळिंब पिकावर ‘तेल्या’ रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला असून अनेक बागा अक्षरशः उद्ध्वस्त झाल्या आहेत. श्रीगोंदे तालुक्यातील हंगेवाडी परिसरातही या संकटाचा फटका बसला असून शेतकऱ्यांना आपल्या बागांवर नांगर फिरवण्याची वेळ आली आहे.
हंगेवाडी येथील तरुण शेतकरी तुषार नवले आणि विशाल नवले यांनी मोठ्या मेहनतीने उभी केलेली डाळिंब बाग वादळी वाऱ्यामुळे आणि रोगाच्या प्रादुर्भावामुळे मोठ्या प्रमाणात नष्ट झाली आहे. या नुकसानीमुळे त्यांचे तब्बल १० लाख रुपयांहून अधिक आर्थिक नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे शासनाने तातडीने नुकसान भरपाई जाहीर करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
डाळिंब पिकावर ‘तेल्या’ रोगाचा वाढता प्रादुर्भाव शेतकऱ्यांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. रोग नियंत्रणासाठी विविध औषधांची फवारणी करूनही अपेक्षित परिणाम दिसून येत नसल्याने अनेक शेतकऱ्यांचे लाखो रुपये खर्चूनही नुकसान टळलेले नाही. परिणामी काही शेतकऱ्यांनी संपूर्ण बागाच काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
याशिवाय अवकाळी पाऊस आणि जोरदार वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी डाळिंबाची झाडे उन्मळून पडली असून फळांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. फळांची गुणवत्ता खालावल्याने बाजारभावावरही परिणाम होत आहे. उत्पादन घटल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडले असून अनेकांना कर्जाचा सामना करावा लागत आहे.
बागा वाचवण्यासाठी काही शेतकरी शेडनेटसारख्या अतिरिक्त उपाययोजनांचा अवलंब करत असले तरी त्यासाठीही मोठा खर्च करावा लागत आहे. त्यामुळे आधीच संकटात असलेल्या शेतकऱ्यांवरील आर्थिक भार अधिक वाढला आहे.
दरम्यान, बाधित डाळिंब बागांचे तातडीने पंचनामे करून शासनाने योग्य नुकसान भरपाई द्यावी, तसेच डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना विशेष आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.









