मुरुड-जंजिरा | प्रतिनिधी
मुरुड-जंजिरा तालुक्यातील मजगाव ग्रामपंचायत हद्दीत पहिल्याच पावसात काही भागांमध्ये गटारे तुंबून कचरा व घाण रस्त्यावर आल्याचे चित्र दिसून आले. त्यामुळे परिसरात अस्वच्छता निर्माण झाली असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या परिस्थितीसाठी ग्रामपंचायत प्रशासन थेट जबाबदार नसून, काही ग्रामस्थांकडून होत असलेला निष्काळजीपणा आणि हलगर्जीपणा हे प्रमुख कारण असल्याचे स्पष्ट होत आहे. अनेक नागरिक घरगुती कचरा, प्लास्टिक व इतर टाकाऊ वस्तू थेट गटारांमध्ये टाकतात. त्यामुळे गटारे तुंबून पावसाचे पाणी निचरा होण्यास अडथळा निर्माण होतो.
यंदाच्या पहिल्याच पावसात गटारांमध्ये साचलेला कचरा पाण्यासोबत रस्त्यावर आल्याने ही समस्या पुन्हा एकदा समोर आली आहे.
मजगाव ग्रामपंचायतीकडून नियमितपणे घंटागाडीच्या माध्यमातून कचरा संकलन केले जाते. तसेच स्वच्छता मोहीम व जनजागृती कार्यक्रम राबवून नागरिकांना वारंवार सूचना दिल्या जातात. “आम्ही” संस्थेचे पदाधिकारी व स्वयंसेवकही ग्रामपंचायतीसोबत स्वच्छता अभियानात सक्रिय सहभाग घेत आहेत. मात्र काही नागरिकांकडून नियमांचे पालन न केल्याने स्वच्छता उपक्रमांच्या परिणामकारकतेवर परिणाम होत असल्याचे दिसत आहे.
या प्रकारामुळे दुर्गंधी, डासांची उत्पत्ती तसेच साथीच्या आजारांचा धोका वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी कचरा घंटागाडीतच टाकावा, गटारांमध्ये कचरा टाकू नये आणि स्वच्छ गाव अभियानात सहकार्य करावे, असे आवाहन ग्रामपंचायत व “आम्ही” संस्था यांच्याकडून करण्यात आले आहे.
“गाव स्वच्छ ठेवणे ही केवळ ग्रामपंचायतीची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. जबाबदारीने वागल्यासच स्वच्छ, सुंदर आणि निरोगी मजगाव घडू शकते,” असा संदेश या घटनेतून देण्यात आला आहे.









