जांब | वार्ताहर
मोहाडी तालुक्यातील धुसाळा व परिसरात सोमवारी दुपारी सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास आलेल्या वादळी वाऱ्यासह मध्यम स्वरूपाच्या पावसाने मोठे नुकसान केले. अवघ्या काही मिनिटांच्या या नैसर्गिक संकटात अनेक झाडे उन्मळून पडली, जनावरांचे गोठे कोसळले तसेच शेतकऱ्यांच्या रब्बी हंगामातील धानपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अचानक आलेल्या या संकटामुळे शेतकरी आणि नागरिक हवालदिल झाले असून प्रशासनाने तातडीने पंचनामे करून मदत जाहीर करावी, अशी मागणी होत आहे.
आंधळगाव-धुसाळा मार्गावरील Bala Dhenge यांच्या घरासमोरील सुमारे ७० वर्षे जुने विशाल वृक्ष वादळी वाऱ्याच्या तडाख्यात उन्मळून पडले. हे झाड थेट वीजवाहिन्यांवर कोसळल्याने वीजपुरवठा विस्कळीत झाला आणि महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मोठी कसरत करावी लागली. काही काळ या मार्गावरील वाहतूकही ठप्प झाली होती. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
तसेच Guddu Bopche यांच्या घराजवळील आंब्याचे झाड तुटून थेट इमारतीवर कोसळल्याने घराचे नुकसान झाले. परिसरातील Mahatma Jyotiba Phule Vidyalaya परिसरातील कडुलिंबाचे झाडही कोसळल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
नवेगाव-धुसाळा मार्गावरील अनेक शेतकऱ्यांनी जनावरांच्या चाऱ्यासाठी साठवून ठेवलेली तणस वादळी वाऱ्यामुळे रस्त्यावर विखुरली. त्यामुळे पशुपालक आणि शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. नवेगाव येथील पशुपालक Ramdayal Pardhi यांचा गुरांचा गोठा कोसळून त्यामध्ये सहा जनावरे अडकली होती. जनावरांच्या आरडाओरडीनंतर ग्रामस्थांनी तात्काळ धाव घेत गोठ्याचे अवशेष बाजूला करून सर्व जनावरांची सुखरूप सुटका केली.
रब्बी धानपिकांचे मोठे नुकसान
वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाचा सर्वाधिक फटका रब्बी हंगामातील धानपिकांना बसला. कापणीसाठी तयार असलेले अनेक शेतकऱ्यांचे धानपीक शेतातच आडवे पडले. वाऱ्याच्या प्रचंड वेगामुळे पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली असून उत्पादनात घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
धुसाळा येथील शेतकरी Ratanlal Bopche यांच्या शेतातील धानपीक पूर्णपणे जमीनदोस्त झाले. या नुकसानीमुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढावले असून शासनाने तातडीने मदतीचा हात द्यावा, अशी मागणी होत आहे.
पंचनाम्यांची मागणी
वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीची महसूल व कृषी विभागाने तातडीने पाहणी करून पंचनामे करावेत, तसेच नुकसानग्रस्त शेतकरी, पशुपालक आणि नागरिकांना योग्य आर्थिक मदत व नुकसानभरपाई द्यावी, अशी जोरदार मागणी धुसाळा व परिसरातील ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.







