दोडामार्ग | प्रतिनिधी
कसई-दोडामार्ग शहरातील मुख्य चौक आणि महत्त्वाच्या ठिकाणी बसविण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे गेल्या काही महिन्यांपासून बंद असल्याने शहराच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. हे कॅमेरे तातडीने सुरू करण्यात यावेत, अशी मागणी नगराध्यक्ष चेतन चव्हाण, दोडामार्ग तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष सागर शिरसाट यांच्यासह व्यापारी आणि नागरिकांनी पोलीस निरीक्षक हेमचंद्र खोपडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, शहरातील महत्त्वाच्या चौकांमधील सीसीटीव्ही यंत्रणा बंद पडल्याने वाहनचोरी, घरफोडी यांसारख्या घटनांमध्ये वाढ होत असून अशा गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी पोलिसांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. परिणामी, खासगी आस्थापनांच्या सीसीटीव्ही फुटेजवर अवलंबून राहावे लागत असल्याचेही निवेदनात म्हटले आहे.
शहराचा ‘तिसरा डोळा’ म्हणून ओळखली जाणारी ही यंत्रणा बंद असल्यामुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. तसेच गुन्हेगारी, वाहतूक समस्या आणि अपघातांच्या घटनांवर नियंत्रण ठेवणेही कठीण होत असल्याची चिंता व्यक्त करण्यात आली आहे.
यामुळे कसई-दोडामार्ग मुख्य चौकासह शहरातील सर्व महत्त्वाच्या ठिकाणांवरील सीसीटीव्ही कॅमेरे तातडीने कार्यान्वित करून नागरिकांना सुरक्षित आणि भयमुक्त वातावरण उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी रुपेश मयेकर, सुधीर पनवेलकर, समीर रेडकर, पिकी कवठणकर, अशोक नाईक, सुदेश मलिक, भूषण सावंत, दीपक बुगडे, नितीन मनेरीकर आणि बाळा रेडकर उपस्थित होते. त्यांनीही शहराच्या सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही यंत्रणा तातडीने सुरू करण्याची आवश्यकता व्यक्त केली.
