परतूर | प्रतिनिधी
परतूर शहरात वाढत्या मोकाट जनावरांच्या समस्येमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून, तातडीने सुसज्ज कोंडवाडा सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. शहरातील मुख्य रस्ते, चौक, बाजारपेठ तसेच वर्दळीच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गाय, बैल आणि इतर जनावरे मोकाट फिरत असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून अपघातांचा धोका वाढला आहे.
भाजपाचे तालुका संघटन सरचिटणीस तथा नगरसेवक प्रतिनिधी सावता सुभाषराव काळे यांनी या प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. त्यांनी सांगितले की, मोकाट जनावरांमुळे वाहतुकीची कोंडी होत असून आसपासच्या शेतीचेही मोठे नुकसान होत आहे. याशिवाय ही जनावरे कचऱ्याच्या ढिगाऱ्यांमधून अन्न शोधत असल्याने त्यांच्या आरोग्यावरही गंभीर परिणाम होत आहेत.
शहरातील अनेक नागरिकांनी यापूर्वीही नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या आहेत. रस्त्यांवर बसलेल्या जनावरांमुळे वाहनचालक आणि पादचाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून, यापूर्वीही अशा प्रकारांमुळे काही अपघात घडल्याची नोंद आहे.
नागरिकांच्या मते, मोकाट जनावरांचा प्रश्न हा केवळ वाहतुकीपुरता मर्यादित नसून मुक्या प्राण्यांच्या सुरक्षिततेशीही संबंधित आहे. त्यामुळे शहरात तातडीने कोंडवाडा सुरू करून मोकाट जनावरे तेथे ठेवावीत. तसेच ज्या मालकांनी आपली जनावरे बेवारसपणे रस्त्यावर सोडली आहेत, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
शहरातील नागरिकांच्या सुरक्षिततेसह मुक्या प्राण्यांच्या संरक्षणासाठी नगरपालिका प्रशासनाने त्वरित पावले उचलावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
