भोकर : नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यातील ग्रामपंचायत भोसी येथील सार्वत्रिक निवडणुकीसाठी जाहीर झालेल्या आरक्षण सोडतीवर ग्रामस्थांनी तीव्र आक्षेप नोंदवला आहे. या प्रकरणी पुनर्तपासणी करण्यात यावी, अशी मागणी करत संतोष गंगाधर आक्केमवाड यांनी थेट मुख्यमंत्री महोदयांकडे लेखी निवेदन सादर करून न्यायाची मागणी केली आहे.
दिनांक १२ जून २०२६ रोजी झालेल्या आरक्षण सोडतीमध्ये ओबीसी प्रवर्गासाठी केवळ एकच जागा राखीव ठेवण्यात आल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. अर्जदारांच्या म्हणण्यानुसार, भोसी गावात ओबीसी प्रवर्गाची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात असून पूर्वीच्या निवडणुकांमध्ये या प्रवर्गासाठी चार जागा आरक्षित राहिल्या होत्या.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, मागील कार्यकाळातही ग्रामपंचायतीच्या ११ सदस्यांपैकी ओबीसी प्रवर्गाचे चार सदस्य होते. अशा परिस्थितीत नव्या आरक्षण सोडतीत केवळ एकच जागा देणे अन्यायकारक असून नियमांचे उल्लंघन असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणाची तात्काळ पुनर्तपासणी करून नियमानुसार सुधारणा करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी नांदेड आणि तहसीलदार भोकर यांनाही निवेदनाची प्रत पाठवण्यात आली आहे.
या निर्णयामुळे गावातील राजकीय वातावरण तापले असून प्रशासन यावर काय भूमिका घेते, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
