नेवासा : मान्सूनच्या आगमनाला झालेल्या विलंबामुळे नेवासा तालुक्यातील सुरेगाव (गंगा), उस्थळ खालचा, बोरगाव, बेलपांढरी आदी गावांतील शेतकऱ्यांच्या चिंतेत मोठी वाढ झाली आहे. जून महिना सुरू होऊन १५ दिवस उलटले तरी अद्याप पेरणीयोग्य पाऊस न झाल्याने खरीप हंगामातील पेरण्या खोळंबल्या आहेत.
काही शेतकऱ्यांची शेती बागायतीखाली येत असल्याने त्यांनी खरिपाची पेरणी केली असली, तरी महावितरणाकडून केवळ सहा तास वीजपुरवठा होत असल्याने आणि शेतीपंपाच्या विजेच्या सततच्या लपंडावामुळे पिके पाण्याअभावी होरपळण्याच्या स्थितीत आहेत. दुसरीकडे, पाऊस न झाल्याने अनेक शेतकऱ्यांची पेरणी अद्याप रखडलेली असून शेतकऱ्यांच्या नजरा आता आभाळाकडे लागल्या आहेत.
जूनचा अर्धा महिना उलटून गेला तरी समाधानकारक पाऊस न झाल्याने अन्नदाता शेतकरी हवालदिल झाला आहे. पेरणीसाठी शेतांची मशागत करून ठेवली असली, तरी पावसाअभावी बियाणे टाकता येत नसल्याची खंत शेतकरी व्यक्त करत आहेत. कापूस, तूर, सोयाबीन, मका, बाजरी आदी खरीप पिकांच्या पेरणीचे नियोजन पूर्णपणे कोलमडले आहे.
“मागील वर्षी ३० मेपासून पावसाला सुरुवात झाली होती. मात्र यंदा १६ जून उजाडला तरी पावसाचा पत्ता नाही. पेरणी लांबली तर उत्पादनावर परिणाम होणार,” अशी चिंता पंचक्रोशीतील शेतकरी व्यक्त करत आहेत.
सततच्या बदलत्या हवामानामुळे आणि पावसाच्या अनिश्चिततेमुळे शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले असून, लवकरात लवकर दमदार पावसाची हजेरी लागावी, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत.
