श्रीगोंदा : प्रतिनिधी
श्रीगोंदा तालुक्यातील चांभुर्डी येथे पाण्याच्या टाकीत साठवणूक न करता थेट तलावातून नळाद्वारे पाणीपुरवठा करण्याची योजना राबवली जात असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. सुरुवातीला या आगळ्यावेगळ्या प्रयोगाची चर्चा झाली असली, तरी प्रत्यक्षात नागरिकांना दूषित व अस्वच्छ पाणी पिण्यासाठी मिळत असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, पारंपरिक पद्धतीनुसार पाणी प्रथम टाकीत साठवून त्यावर शुद्धीकरण प्रक्रिया केली जाते. मात्र, चांभुर्डी येथील योजनेत कोणतीही फिल्टर यंत्रणा न बसवता तलावातील पाणी थेट गावठाणातील नळजोडण्यांना पुरवले जात आहे. त्यामुळे तलावातील गाळयुक्त आणि दूषित पाणी थेट नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचत आहे.
सध्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर तलावातील पाण्यात गाळ, कचरा आणि अस्वच्छता वाढली असून, त्याच पाण्याचा थेट पुरवठा होत असल्याने जलजन्य आजारांचा धोका निर्माण झाला आहे. “थेट तलावातील कचरा आणि दूषित पाणी आमच्या ताटात वाढले जात आहे,” अशा संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांकडून व्यक्त केल्या जात आहेत.
या योजनेच्या तांत्रिक मंजुरीबाबत तसेच संबंधित अभियंत्यांच्या कार्यपद्धतीबाबतही ग्रामस्थांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहे. कोणतीही साठवणूक किंवा शुद्धीकरण प्रक्रिया न करता थेट पाणीपुरवठा करण्यात येत असल्याने नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
या संपूर्ण प्रकरणाची तातडीने तांत्रिक तपासणी करून दोषींवर कारवाई करावी तसेच ग्रामस्थांना शुद्ध आणि सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी ग्रामस्थांनी जिल्हा प्रशासन, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा पाणीपुरवठा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली आहे.
