नंदुरबार प्रतिनिधी :
सैताने येथे शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी शेतकरी पुत्र प्रमोद पाटील यांनी अनोखे आंदोलन सुरू केले आहे. सरकारने सरसकट कर्जमाफी करावी तसेच कर्जमाफीच्या शासन निर्णयातील अटी रद्द कराव्यात, या मागणीसाठी त्यांनी जिवंतप्रेत यात्रा काढून गावातील विहिरीत जलत्याग व अन्नत्याग करत बेमुदत आंदोलनाला सुरुवात केली.
प्रमोद पाटील यांनी सांगितले की, शेतकरी मोठ्या आर्थिक संकटातून जात असून शासनाने पूर्वी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र अद्यापही अनेक शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबलेले आहेत. त्यामुळे कोणत्याही अटींशिवाय सरसकट कर्जमाफी जाहीर करण्यात यावी, अशी त्यांची मागणी आहे.
आंदोलनकर्त्यांचा आरोप आहे की, प्रशासनाने या आंदोलनाची गांभीर्याने दखल घेतलेली नाही. जिल्हास्तरीय अधिकारी आंदोलनस्थळी भेट देत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. तसेच आंदोलनादरम्यान पोलिसांनी कायदा व सुव्यवस्थेच्या नावाखाली आंदोलनाला हिंसक वळण लागेल, असे वातावरण निर्माण करून लाठीचार्ज केल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
“आम्ही संविधानिक मार्गाने आंदोलन करत आहोत. शासनाने दिलेला शब्द पाळावा आणि शेतकऱ्यांना न्याय द्यावा,” असे प्रमोद पाटील यांनी सांगितले. सरकारने मागण्यांवर निर्णय न घेतल्यास गावातून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
