पानचिंचोली प्रतिनिधी :
लातूर जिल्ह्यातील पानचिंचोली येथील जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळेत नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे आगळ्यावेगळ्या पद्धतीने स्वागत करण्यात आले. ‘विद्यार्थ्यांची पाऊलं पडतायत शिक्षणाकडे’ या संकल्पनेतून विद्यार्थ्यांची बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात आली तसेच नववधूप्रमाणे कुंकवात पाय बुडवून त्यांचे शाही स्वागत करण्यात आले.
शाळा प्रवेशोत्सवानिमित्त विद्यार्थ्यांनी शाळेच्या उंबरठ्यावर पाऊल ठेवताच शिक्षकांनी त्यांचे औक्षण केले. कुंकवाच्या पावलांनी स्वागत करत विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लागावी आणि शाळेबद्दल आत्मीयता निर्माण व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आल्याची माहिती केंद्रप्रमुख पांडुरंग मस्के यांनी दिली.
विविध उपक्रमांनी परिसर गजबजला
जिल्हाभरातील शाळांमध्ये पहिल्याच दिवशी विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. रोटरी क्लबच्या वतीने प्रातिनिधिक स्वरूपात पाच विद्यार्थिनींना सायकलींचे वाटप करण्यात आले. यावेळी प्लास्टिकमुक्ती आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेशही देण्यात आला.
तसेच सेवानिवृत्त शिक्षक प्रवीण होळीकर यांनी जिल्हा परिषद शाळा, पानचिंचोलीला प्रिंटर भेट देऊन शाळेच्या डिजिटल उपक्रमांना हातभार लावला.
या कार्यक्रमाला मुख्याध्यापक ज्ञानोबा साबणे, ढोके काकासाहेब, भोसले झुंबर, जागले शारदा, रणखांब अयोध्या यांच्यासह शिक्षक, पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रविण रणदिवे यांनी केले तर आभार प्रदर्शन संजीव राजमाने यांनी केले.
या अनोख्या स्वागत सोहळ्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून शिक्षणाबद्दल सकारात्मक भावना दृढ झाल्याचे दिसून आले.
