प्रतिनिधी : | दि. १५ जून २०२६
सिल्लोड तालुक्यातील भवन गावात भीषण पाणीटंचाईमुळे नागरिकांचे हाल होत असून, गेल्या २० ते २५ दिवसांपासून नळाला पाणी न आल्याने संतप्त महिलांनी अखेर ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकत प्रशासनाविरोधात तीव्र निषेध व्यक्त केला. वाढते तापमान, कोरडे पडलेले नळ आणि प्रशासनाचे दुर्लक्ष यामुळे भवन गावातील नागरिकांचा संताप आता उफाळून आला आहे.
पूर्णा नदीच्या काठावर वसलेल्या भवन गावात पाण्यासाठी नागरिकांना अक्षरशः वणवण भटकावे लागत आहे. विशेषतः महिला, वृद्ध आणि लहान मुलांचे मोठे हाल होत आहेत. घरात पिण्याचे पाणी नसल्याने दैनंदिन कामे ठप्प झाली असून, शाळकरी मुलांच्या अंघोळीपासून ते जेवणाच्या तयारीपर्यंत अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. “आम्ही जगायचे तरी कसे?” असा सवाल महिलांनी प्रशासनाला केला आहे.
दरम्यान, गावातील पाणीटंचाईचा फायदा घेत खासगी टँकर व्यवसाय फोफावत असल्याचे चित्र दिसत आहे. एका टँकरसाठी नागरिकांना १००० ते १२०० रुपये मोजावे लागत असून, आर्थिकदृष्ट्या कमकुवत कुटुंबांवर याचा मोठा ताण पडत आहे. ग्रामपंचायतीचा पाणीपुरवठा विभाग निष्क्रिय ठरल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
अशा कठीण परिस्थितीत सामाजिक कार्यकर्ते रामदास पाटील साळवे यांनी स्वतःच्या बोअरवेलमधून नागरिकांना मोफत पाणी उपलब्ध करून दिल्याने गावकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. महिलांनी त्यांच्या या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करत त्यांचे जाहीर आभार मानले.
पाणीअभावी गावातील स्वच्छतेचाही प्रश्न गंभीर बनला आहे. संडास आणि स्नानगृहांचा वापर करणे कठीण झाले असून, महिलांना उघड्यावर जाण्याची वेळ येत असल्याने आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे. शासन एकीकडे स्वच्छता अभियान राबवत असताना भवन ग्रामपंचायतीकडून मात्र मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.
“आमच्या हक्काचे पाणी मिळेपर्यंत आंदोलन सुरूच राहील,” असा इशारा संतप्त महिला मंडळाने दिला आहे. प्रशासनाने तातडीने उपाययोजना न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही गावकऱ्यांनी दिला आहे.
आता तरी जिल्हा प्रशासन भवन गावातील नागरिकांच्या पाणी समस्येकडे गांभीर्याने लक्ष देणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
