पीडित कुटुंबाला २५ लाखांची आर्थिक मदत व शासकीय नोकरी देण्याचे निवेदन
प्रतिनिधी :
परळी येथे घडलेल्या तौहीद खान हत्या प्रकरणातील आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अंतर्गत कठोर कारवाई करण्यात यावी तसेच पीडित कुटुंबाला तात्काळ २५ लाख रुपयांची आर्थिक मदत देऊन कुटुंबातील एका सदस्यास शासकीय सेवेत सामावून घ्यावे, अशी मागणी कुल जमाती तन्जिम पाथरीच्या वतीने करण्यात आली आहे.
यासंदर्भात कुल जमाती तन्जिम पाथरीच्या युवक शिष्टमंडळाने उपजिल्हाधिकारी पाथरी यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री आणि जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर केले. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, तौहीद खान यांची निर्घृण हत्या करण्यात आली असून या घटनेमुळे समाजात तीव्र संतापाची भावना निर्माण झाली आहे. संबंधित आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करून त्यांच्यावर मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा, जेणेकरून भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडणार नाहीत.
तसेच मृत तौहीद खान यांचे कुटुंब अत्यंत गरीब परिस्थितीत जीवन जगत असून कुटुंबाचा आधार हरपला आहे. त्यामुळे शासनाने मानवतावादी दृष्टीकोनातून पीडित कुटुंबाला तात्काळ २५ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करावी आणि कुटुंबातील एका पात्र सदस्यास शासकीय नोकरी देऊन न्याय द्यावा, अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली.
यावेळी हाफेज अब्दुल जब्बार साब, समीर बाबा खान, नगरसेवक मुजीब आलम, नईम अन्सारी सर, आकेब खान, अश्फाक सौदागर, अल्ताफ अन्सारी, पत्रकार अहमद अन्सारी, अय्युब खान, अन्वर खान, शेख अजहर, शेख रफिक, मोहम्मद इलियास बागवान, इमरान अन्सारी, रईस, हमीद खान, इरफान खान यांच्यासह विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
निवेदनाद्वारे शासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन पीडित कुटुंबाला न्याय द्यावा, अशी मागणी शिष्टमंडळाने केली आहे.
