पलूस | प्रतिनिधी
प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गाविरोधातील लढा अधिक तीव्र करण्यासाठी आणि बाधित शेतकऱ्यांच्या न्याय हक्कांसाठी आवाज बुलंद करण्याच्या उद्देशाने शक्तिपीठ महामार्ग संघर्ष समितीच्या वतीने शनिवार, दि. २० जून २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता कुंडल (ता. पलूस) येथे सर्वपक्षीय शेतकरी एल्गार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा बलवडी-विटा रोडवरील मगदूम मल्टीपर्पज हॉलमध्ये, क्रांती साखर कारखान्याजवळ पार पडणार असल्याची माहिती संघर्ष समितीचे निमंत्रक ॲड. दीपक लाड यांनी दिली.
प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गामुळे पलूस, कडेगाव, खानापूर, वाळवा आणि शिराळा तालुक्यातील हजारो एकर सुपीक शेती बाधित होण्याची शक्यता असून अनेक शेतकरी भूमिहीन होण्याच्या भीतीत आहेत. त्यामुळे या महामार्गाला परिसरातील शेतकऱ्यांकडून तीव्र विरोध होत आहे.
शेतकऱ्यांच्या जमिनीचे संरक्षण करण्यासाठी संघर्ष समितीने यापूर्वी घोगाव येथे एल्गार मेळावा, नेवरी ते घोगाव आत्मक्लेश पदयात्रा, विटा येथील आक्रोश मेळावा तसेच ड्रोन सर्वेक्षणाविरोधातील आंदोलन अशा विविध माध्यमांतून आंदोलन उभारले आहे.
२० जून रोजीच्या मेळाव्यात शक्तिपीठ महामार्गाचे संभाव्य परिणाम, पुढील आंदोलनाची दिशा, कायदेशीर लढ्याचे नियोजन आणि विविध शेतकरी संघटनांमधील समन्वय यावर चर्चा होणार आहे. या मेळाव्यास राज्यातील शेतकरी संघटनांचे नेते, विविध पक्षांचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांना निमंत्रित करण्यात येणार असल्याचे समितीने सांगितले.
घोगाव, कुंडल, कुंभारगाव, देवराष्ट्रे, शिरगाव, शेळकबाव, वडिये रायबाग, आंबेगाव, नेवरी, भाग्यनगर, माहुली, नागेवाडी, चिखलहोळ, भेंडवडे, विटा आदी गावांमधून मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित राहणार असल्याची माहितीही देण्यात आली आहे.
बाहेरगावाहून येणाऱ्या शेतकऱ्यांसाठी वाहन पार्किंगची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली असून, बाधित शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने मेळाव्यास उपस्थित राहावे, असे आवाहन संघर्ष समितीचे निमंत्रक ॲड. दीपक लाड यांनी केले आहे.


