पलूस प्रतिनिधी :
प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गाविरोधातील जनआंदोलन अधिक व्यापक आणि संघटित करण्याच्या उद्देशाने नेवरी येथे संघर्ष समितीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. मंगळवार दि. १६ जून रोजी सायंकाळी आयोजित या बैठकीत आगामी आंदोलनाची दिशा, शेतकऱ्यांच्या हरकतींची प्रक्रिया, जनजागृती मोहीम आणि गावागावांत संघटन मजबूत करण्याबाबत चर्चा करण्यात आली.
बैठकीत संघर्ष समितीचे निमंत्रक दीपक लाड यांनी शेतकरी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना प्रस्तावित महामार्गामुळे सुपीक शेती, आर्थिक नुकसान आणि विस्थापनाचा प्रश्न निर्माण होणार असल्याचे सांगितले. हा लढा शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी आणि पुढील पिढ्यांच्या भवितव्यासाठी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आगामी काळात आंदोलन अधिक तीव्र करण्यासाठी गावपातळीवर जनजागृती वाढविणे, अधिकाधिक शेतकऱ्यांना सहभागी करून घेणे आणि शासनाकडे लोकशाही मार्गाने भूमिका मांडण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.
यावेळी विद्याधर महाडिक आणि महेश पवार यांनी शेतकरी हरकती फॉर्म भरण्याबाबत माहिती दिली. हरकत दाखल करताना आवश्यक कागदपत्रे, मुदतीचे महत्त्व आणि प्रक्रियेतील बाबींविषयी त्यांनी मार्गदर्शन केले.
बैठकीत उपस्थित शेतकरी आणि ग्रामस्थांनी शक्तिपीठ महामार्गाविरोधातील संघर्ष अधिक जोमाने राबविण्याचा निर्धार व्यक्त केला. तसेच शेतकऱ्यांच्या जमिनी आणि हक्कांच्या संरक्षणासाठी एकसंघपणे लढा सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.


