प्रतिनिधी : लातूर
लातूर : लातूर विमानतळावरील अत्यावश्यक पायाभूत सुविधा विकसित करून विमानतळ पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यासाठी राज्य शासनाने तब्बल ५६ कोटी ७४ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. तसेच विमानतळाच्या परिवलनासाठी प्रतिवर्षी ३७.७८ लाख रुपयांच्या खर्चासही शासनाने मान्यता दिली असून यासंदर्भातील अधिकृत आदेश जारी करण्यात आला आहे.
लातूर विमानतळाच्या विकासाचा विषय जिल्ह्यातील सर्वच राजकीय नेत्यांनी वेळोवेळी शासन दरबारी लावून धरला होता. अखेर या पाठपुराव्याला यश मिळाले असून विमानतळाच्या विकासासाठी महत्त्वाची कामे हाती घेण्यात येणार आहेत.
यामध्ये ३.३८ किलोमीटर लांबीची संरक्षण भिंत उभारणे, ४.५ मीटर रुंदीचा आणि ८ किलोमीटर लांबीचा रस्ता निर्माण करणे, धावपट्टी सुधारणा कामे, नाईट लँडिंग सुविधा उपलब्ध करणे, अग्निशामक केंद्र, आपत्कालीन सेवा केंद्र, अँटी हायजॅकिंग रूमचे नूतनीकरण तसेच अत्याधुनिक सीसीटीव्ही यंत्रणा उभारणे या महत्त्वाच्या कामांचा समावेश आहे.
या सर्व विकासकामांमुळे लातूर विमानतळाचा सर्वांगीण विकास होऊन विमानसेवा अधिक सक्षम, सुरक्षित आणि आधुनिक होणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
लातूर विमानतळाच्या विकासासाठी आमदार अभिमन्यू पवार यांनी विधीमंडळात आवाज उठवण्याबरोबरच मुख्यमंत्री Devendra Fadnavis आणि उद्योगमंत्री Uday Samant यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यानंतर शासन स्तरावर या विषयाला गती मिळाली असल्याचे सांगितले जात आहे.
