चांदवड, प्रतिनिधी :
चांदवड तालुक्यात टोमॅटो, कोबी, मिरची यांसह विविध भाजीपाला पिकांची मोठ्या प्रमाणावर लागवड करण्यात आली आहे. मात्र पावसाने दडी मारल्याने आणि तापमानात मोठी वाढ झाल्याने ही पिके उन्हाच्या तडाख्याने होरपळून निघत आहेत.
हवामान तज्ज्ञांकडून पावसाचे अंदाज सातत्याने पुढे ढकलले जात असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक भागांत विहिरींनी तळ गाठला असून शेततळ्यांमधील पाणीसाठाही झपाट्याने कमी होत आहे.
पाणीटंचाईमुळे लागवड केलेली रोपे सुकत असून शेतकऱ्यांना दुबार खर्च करून पुन्हा रोपे लावावी लागत आहेत. तर मल्चिंग पेपरचे तापमान वाढल्याने उष्णतेमुळे रोपांची पाने करपून जात असल्याचे चित्र आहे.
पिके वाचवण्यासाठी शेतकरी इतर तालुक्यांतून महागड्या दराने टँकरद्वारे पाणी आणत आहेत. तरीही परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याने कोट्यवधी रुपयांच्या नुकसानीची भीती व्यक्त केली जात आहे.
पाऊस लांबल्यास मोठे नुकसान होण्याची शक्यता असून, “आता आभाळाकडे डोळे लागले आहेत” अशी भावना शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.
