मारेगाव | प्रतिनिधी :
तालुक्यातील करणवाडी येथील शेतकरी संदीप सदाशिव उंबरे यांनी आपल्या मागण्यांसाठी मारेगाव तहसील कार्यालयासमोर बैलबंडी व जनावरांसह बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे. या अनोख्या आंदोलनामुळे संपूर्ण तालुक्याचे लक्ष वेधले गेले असून प्रशासनाच्या भूमिकेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, करणवाडी, खडकी, घोरधडा आणि नरसाळा या गावांना जोडणारा शिवदुरा पांदण रस्ता अतिक्रमणामुळे बंद झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या समस्येबाबत अनेक वेळा तहसील प्रशासनाकडे निवेदने देऊनही कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आली नसल्याचे उपोषणकर्ते संदीप उंबरे यांनी सांगितले.
शेतकरी हा “जगाचा पोशिंदा” म्हणून ओळखला जातो, मात्र त्यालाच न्याय मिळत नसल्याची खंत व्यक्त करत त्यांनी थेट तहसील कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे. विशेष म्हणजे, त्यांनी केवळ उपोषण न करता स्वतःची बैलगाडी, दोन बैल, एक गाय आणि एक वासरू यांनाही सोबत आणत आंदोलन अधिक लक्षवेधी केले आहे.
उपोषणकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, समस्या मांडण्यासाठी तहसीलदारांकडे गेल्यानंतर त्यांना पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करण्याचा सल्ला देण्यात आला. मात्र, प्रशासकीय स्तरावर कोणतीही दखल घेतली जात नसल्याने अखेर त्यांनी आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारला.
या आगळ्यावेगळ्या आंदोलनामुळे परिसरात चर्चेला उधाण आले असून अनेक नागरिकांनी घटनास्थळी भेट देत शेतकऱ्याला पाठिंबा दर्शविला आहे. “यापूर्वी अनेक आंदोलने पाहिली, मात्र स्वतःची जनावरे घेऊन तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसलेला शेतकरी प्रथमच पाहायला मिळत आहे,” अशी प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करत आहेत.
तालुक्यातील नागरिकांनी तहसील प्रशासनाने तातडीने या प्रकरणाची पडताळणी करून शेतकऱ्यांच्या मागण्यांवर योग्य तो निर्णय घ्यावा, अशी मागणी केली आहे. प्रशासनाने लवकरात लवकर हस्तक्षेप करून संबंधित पांदण रस्त्याचा प्रश्न सोडवावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
