प्रतिनिधी :
कर्जत चौक महामार्गावर दुचाकी आणि ट्रक यांच्यात झालेल्या भीषण अपघातात जितेश रुठे (रा. बीड) या तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या अपघातामुळे परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कर्जत चौक परिसरात दुचाकी आणि ट्रक यांच्यात जोरदार धडक झाली. अपघात इतका भीषण होता की, दुचाकीस्वार जितेश रुठे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला असून मृतदेह पुढील प्रक्रियेसाठी पाठविण्यात आला आहे.
दरम्यान, कर्जत चौक परिसरात वारंवार अपघात होत असल्याने स्थानिक नागरिकांनी प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त केली आहे. चौकात वाहतूक नियंत्रणासाठी आवश्यक सुविधा नसणे, अपुरी प्रकाश व्यवस्था, वेगमर्यादेचे फलक नसणे तसेच सुरक्षिततेच्या उपाययोजनांचा अभाव यामुळे अपघातांचे प्रमाण वाढत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
अपघात रोखण्यासाठी चौकात वाहतूक सिग्नल, स्पीड ब्रेकर, रस्त्यावरील प्रकाश व्यवस्था, सूचना फलक तसेच वाहतूक पोलिसांची नियमित नियुक्ती करण्याची मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे. यापूर्वीही या ठिकाणी अनेक अपघात घडले असून प्रशासनाने तातडीने योग्य उपाययोजना कराव्यात, असा इशाराही नागरिकांनी दिला आहे.
या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून जितेश रुठे यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
