प्रतिनिधी :
शिक्षणाच्या मुख्य प्रवाहापासून दूर असलेल्या आदिवासी, गरीब व गरजू विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आस संस्था महाराष्ट्र यांच्या वतीने कर्जत व पनवेल तालुक्यात मोफत अभ्यासिका वर्ग सुरू करण्यात आले आहेत.
या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांना शालेय अभ्यासात मार्गदर्शन, गृहपाठ पूर्ण करण्यासाठी मदत, स्पर्धा परीक्षांची प्राथमिक तयारी तसेच व्यक्तिमत्त्व विकासासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. विशेषतः दुर्गम वाड्या-वस्त्यांमधील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी पोषक वातावरण मिळावे, हा या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे.
संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, अनेक आदिवासी व आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांतील मुलांना शैक्षणिक सुविधा सहज उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक मार्गदर्शन देऊन त्यांचे शैक्षणिक भविष्य उज्ज्वल करण्याचा प्रयत्न संस्थेमार्फत केला जात आहे.
या अभ्यासिका वर्गांमध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देण्यात येणार असून नियमित मार्गदर्शन, शैक्षणिक साहित्याची उपलब्धता आणि प्रेरणादायी उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयी आवड निर्माण करण्याचे काम केले जाणार आहे.
स्थानिक नागरिक, पालक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी या उपक्रमाचे स्वागत करत आस संस्था महाराष्ट्रच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक केले आहे. भविष्यातही अशा उपक्रमांद्वारे अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षणाची संधी पोहोचविण्याचा संस्थेचा मानस असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
