प्रतिनिधी :
जून महिना संपत आला तरी समाधानकारक पाऊस न झाल्याने कर्जत तालुक्यातील शेतकरी चिंतेत सापडला आहे. पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या बळीराजाची नजर आता आकाशाकडे लागली असून, शेतीच्या कामांना विलंब होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये हताशेचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरवर्षी याच काळात पेरणीची लगबग सुरू असते. मात्र यंदा पावसाने ओढ दिल्याने अनेक शेतकऱ्यांनी पेरणीची कामे पुढे ढकलली आहेत. काही ठिकाणी झालेल्या तुरळक सरींमुळे जमिनीत पुरेसा ओलावा निर्माण झाला नसल्याने पेरणीसाठी अनुकूल परिस्थिती तयार झालेली नाही.
कर्जत तालुक्यात भातशेती हा प्रमुख व्यवसाय असून हजारो शेतकरी शेतीवर अवलंबून आहेत. वेळेवर पाऊस न झाल्यास भात लागवड, भाजीपाला आणि इतर हंगामी पिकांवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. आधीच वाढते उत्पादन खर्च, बियाणे व खतांच्या किमती यामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांची चिंता आणखी वाढली आहे.
“आता लवकर चांगला पाऊस झाला नाही तर पेरणी उशिरा होईल आणि उत्पादनावर त्याचा परिणाम होईल,” अशी भावना अनेक शेतकऱ्यांनी व्यक्त केली. काही शेतकऱ्यांनी शेतीची पूर्वतयारी पूर्ण केली असली तरी पावसाअभावी कामे खोळंबली आहेत.
दरम्यान, हवामान खात्याच्या अंदाजाकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले असून लवकरच समाधानकारक पाऊस होऊन खरीप हंगामाला सुरुवात व्हावी, अशी प्रार्थना बळीराजा करत आहे.
