शब्दांकन – प्रा. डॉ. रवि दलाल, तिवसा
संकलन – विद्रोही अविनाश गोंडाणे, अमरावती
अमरावती आणि वर्धा जिल्ह्यांना जोडणारी तसेच काही अंशी विभक्त करणारी वरदा नदी विदर्भाच्या इतिहासाची साक्षीदार मानली जाते. या नदीकाठी तिवसा तालुक्यातील शेवटचे गाव म्हणजे धांमत्री. तिवसापासून सुमारे पंधरा किलोमीटर अंतरावर वसलेले हे गाव आपल्या प्राचीन नागेश्वर मंदिरामुळे संपूर्ण परिसरात प्रसिद्ध आहे.
धांमत्री येथील नागेश्वर मंदिराचा इतिहास अनेक दंतकथा, आख्यायिका आणि लोकश्रद्धांशी जोडलेला आहे. काही इतिहास अभ्यासकांच्या मते हे मंदिर सुमारे ९०० ते १००० वर्षांपूर्वी बांधण्यात आले. मंदिर अखंड खडकात कोरलेले असल्याची समजूत अनेक ठिकाणी आढळते; मात्र प्रत्यक्ष पाहणी केल्यास हे मंदिर दगडी बांधकाम शैलीत उभारलेले असल्याचे स्पष्ट होते. पुराच्या पाण्यापासून संरक्षण व्हावे म्हणून मंदिर उंच दगडी पायव्यावर उभारण्यात आले आहे.
धांमत्री परिसरातील मंदिर स्थापत्यकलेचा संबंध नांदपूर, माटोडा-बेनोडा आणि कोंडण्यपूर परिसरातील प्राचीन मंदिरांशी जोडला जातो. आर्वी तालुक्यातील नांदपूर गावाजवळ नदीकाठी आजही दोन प्राचीन मंदिरे चांगल्या स्थितीत आहेत. त्याच परिसरातील माटोडा-बेनोडा मार्गावर पूर्वी एक भव्य दगडी मंदिर अस्तित्वात होते. स्थानिक लोक त्या मंदिराला “हेमाडपंथी मंदिर” म्हणून ओळखत असत. २०२० पर्यंत हे मंदिर अस्तित्वात होते; मात्र जीर्ण अवस्थेमुळे ते कोसळले आणि नंतर गावकऱ्यांनी त्याठिकाणी नवीन मंदिर उभारले.
इतिहास अभ्यासक अनेक दगडी मंदिरांना “हेमाडपंथी” असे संबोधतात; मात्र हेमाडपंथी स्थापत्यशैली नेमकी काय, याबाबत स्पष्ट संशोधन फारसे दिसून येत नाही. काही अभ्यासकांच्या मते विदर्भातील अनेक प्राचीन मंदिरे नागवंशीय किंवा बौद्ध हिनयान पंथाच्या प्रभावाखाली उभारण्यात आली असावीत. मंदिरांमधील गोलाकार स्तूपसदृश शिल्पकला, दगडी बांधकाम आणि कोरीवकाम यावरून हा तर्क मांडला जातो.
धांमत्रीचे नागेश्वर मंदिरही त्याच स्थापत्य परंपरेचा भाग असल्याचे मानले जाते. मंदिरातील शिल्पकला अत्यंत बारकाईने आणि हातोटीने कोरलेली आहे. काही अभ्यासकांच्या मते हिनयान बौद्ध पंथाचा प्रभाव कमी झाल्यानंतर अशा स्थापत्याला “हेमाडपंथी” हे नाव रूढ झाले असावे. तथापि, यासंदर्भात अधिक संशोधन होणे आवश्यक असल्याचे मत जाणकार व्यक्त करतात.
प्राचीन काळी धांमत्री परिसर घनदाट जंगलांनी व्यापलेला होता. त्या काळात नागेश्वर मंदिर एकांतस्थळी बांधण्यात आले होते. त्यानंतर काही वर्षांनी मंदिराजवळ धांमत्री गावाची वसाहत झाली. म्हणजेच मंदिर हे गावापूर्वीचे असल्याचे स्थानिक परंपरेत सांगितले जाते.
कोंडण्यपूर ही प्राचीन नगरी मानली जाते. स्थानिक आख्यायिकेनुसार भिमक राजाची कन्या रुख्मिणी हिला गुप्त भुयारी मार्गाने नागेश्वर मंदिरात दर्शनासाठी आणले जात असे. मात्र कौंडण्यपूर ते धांमत्री इतका लांब भुयारी मार्ग अस्तित्वात असल्याचा कोणताही ठोस पुरावा उपलब्ध नाही. त्यामुळे ही कथा लोकपरंपरेचा भाग मानली जाते.
इतिहासातील उपलब्ध नोंदीनुसार इ.स. १६०७ मध्ये पेशवाई काळात नागेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. त्या काळात मंदिराचा कळस, बांधकाम आणि शिवलिंगाची पुनर्स्थापना करण्यात आल्याचे सांगितले जाते.
या मंदिरातील सर्वात मोठे आकर्षण म्हणजे येथील महाकाय घंटा. ही घंटा इ.स. १९२१ मध्ये अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील मांजरा-म्हसळा गावचे जमीनदार पंजाबराव ढेपे पाटील यांनी दान दिल्याची नोंद आहे. अष्टधातूपासून तयार करण्यात आलेली ही घंटा सुमारे ५०० किलो वजनाची असल्याचे मानले जाते. घंटा नेमकी धांमत्रीत तयार झाली की मांजरा गावात तयार करून बैलगाडीतून आणण्यात आली, याबाबत विविध मते आहेत. अनेकांच्या मते ही घंटा मांजरा गावात तयार करण्यात आली आणि नंतर विशेष प्रयत्नांनी धांमत्रीत आणून दगडी घंटागृहात बसविण्यात आली.
या घंट्याचा नाद सुमारे दोन किलोमीटरपर्यंत ऐकू जातो, असे स्थानिक सांगतात. १९९० च्या दशकात तिवसा परिसरातील कुख्यात दरोडेखोर सर्पण भोसले याने ही घंटा चोरण्याचा प्रयत्न केल्याचीही चर्चा परिसरात आजही केली जाते. मात्र प्रचंड वजनामुळे ती चोरी होऊ शकली नाही.
धांमत्रीचे नागेश्वर मंदिर आजही श्रद्धा, इतिहास आणि स्थापत्यकलेचा अद्भुत संगम मानले जाते. श्रावण महिना आणि महाशिवरात्रीच्या काळात येथे हजारो भाविक दर्शनासाठी येतात. मंदिराच्या स्थापत्यशैलीपासून ते घंट्याच्या इतिहासापर्यंत अनेक बाबींवर अजूनही संशोधनाची गरज असल्याचे जाणकारांचे मत आहे.
विदर्भातील अनेक प्राचीन मंदिरांचा इतिहास अद्याप पूर्णपणे समोर आलेला नाही. त्यामुळे अशा ऐतिहासिक वास्तूंचे पुरातत्त्व विभागाने सखोल संशोधन, उत्खनन आणि संवर्धन करणे आवश्यक असल्याची मागणी इतिहासप्रेमींकडून केली जात आहे.
