परभणी, प्रतिनिधी : परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकरण मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी शांततेत आणि उत्साहपूर्ण वातावरणात मतदान प्रक्रिया पार पडली. तब्बल 99.79 टक्के मतदान झाल्याने राजकीय वर्तुळात प्रचंड उत्सुकता निर्माण झाली असून आता २२ जून रोजी होणाऱ्या मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या निवडणुकीत शिवसेना (शिंदे गट)चे उमेदवार सईद खान, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे डॉ. विवेक नावंदर आणि अपक्ष उमेदवार सुशील देशमुख यांच्यात तिरंगी व अटीतटीची लढत होत आहे. तिन्ही उमेदवारांनी विजयासाठी जोरदार मोर्चेबांधणी केल्याने निकालाबाबत विविध राजकीय अंदाज व्यक्त केले जात आहेत.
निवडणूक प्रशासनाच्या माहितीनुसार सकाळी ८ ते सायंकाळी ४ वाजेदरम्यान मतदान पार पडले. परभणी, सेलू, गंगाखेड, पाथरी, हिंगोली, कळमनुरी आणि वसमत येथील मतदान केंद्रांवर एकूण ४६६ मतदारांपैकी ४६५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यामुळे मतदानाची टक्केवारी ९९.७९ इतकी नोंदविण्यात आली.
विशेष म्हणजे परभणी, गंगाखेड, पाथरी, हिंगोली, कळमनुरी आणि वसमत या सहा मतदान केंद्रांवर शंभर टक्के मतदान झाले. तर सेलू येथे एका मतदाराने मतदान न केल्याने तेथे ९८.३१ टक्के मतदानाची नोंद झाली.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सदस्यांपुरती मर्यादित असलेल्या या निवडणुकीत प्रत्येक मत निर्णायक मानले जात आहे. त्यामुळे क्रॉस व्होटिंग, पक्षीय समीकरणे आणि वैयक्तिक संपर्क यांचा निकालावर किती प्रभाव पडणार, याबाबत राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
सईद खान, डॉ. विवेक नावंदर आणि सुशील देशमुख यांच्यातील तिरंगी संघर्षामुळे निकालाबाबत कोणताही ठाम अंदाज व्यक्त केला जात नसला, तरी तिन्ही गटांकडून विजयाचे दावे केले जात आहेत. त्यामुळे २२ जून रोजी मतपेटीतून नेमका कोणाच्या बाजूने कौल निघणार, याकडे परभणी आणि हिंगोली जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, मतदान प्रक्रिया पूर्णपणे शांततेत पार पडल्याने निवडणूक प्रशासनाने समाधान व्यक्त केले असून मतमोजणीसाठी आवश्यक तयारी सुरू करण्यात आली आहे. आता चार दिवसांच्या प्रतीक्षेनंतर मतदारांचा कौल कोणाच्या पारड्यात पडतो, हे स्पष्ट होणार आहे.
