परभणी/प्रतिनिधी :-
महावितरणच्या हलगर्जीपणामुळे आणि निष्क्रिय कारभारामुळे एका शेतकऱ्याचा बैल विजेच्या तारेच्या संपर्कात येऊन मृत्युमुखी पडल्याची दुर्दैवी घटना मानवत तालुक्यातील मौजे लोहरा येथे घडली आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून शेतकरी वर्गातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लोहरा येथील शेतकरी बाळासाहेब नारायणराव जाधव यांच्या शेताजवळील वीज पोल दि. ६ जून २०२६ रोजी झालेल्या वादळामुळे कोसळला होता. त्यासोबतच विद्युत तारा देखील जमिनीवर पडल्या होत्या. या धोकादायक परिस्थितीबाबत जाधव यांनी महावितरण प्रशासनाकडे वारंवार तक्रार करून पोल उभारणे आणि तारा दुरुस्त करण्याची मागणी केली होती. मात्र संबंधित विभागाने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
दरम्यान, दि. १८ जून रोजी शेतात पाळी सुरू असताना जाधव यांचा बैल खाली पडलेल्या विजेच्या तारेच्या संपर्कात आला. जोरदार विद्युत धक्का बसल्याने बैलाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे शेतकरी कुटुंबावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे.
स्थानिक शेतकरी व ग्रामस्थांनी महावितरण प्रशासनाच्या निष्काळजीपणावर संताप व्यक्त करत अशा प्रकारच्या घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. पडलेल्या विजेच्या तारा, धोकादायक पोल आणि खराब विद्युत यंत्रणा त्वरित दुरुस्त करून नागरिकांच्या जीविताचे रक्षण करावे, अशी मागणीही करण्यात येत आहे.
दरम्यान, संबंधित शेतकऱ्याला तातडीने आर्थिक मदत देण्यात यावी तसेच या घटनेला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
