१२ वर्षांनंतर योजना गुंडाळली; चौकशीची श्रीनिवास बिहाणी यांची मागणी
श्रीरामपूर (प्रतिनिधी) : श्रीरामपूर नगरपालिकेची अत्यंत महत्त्वाकांक्षी ठरलेली भुयारी गटार योजना अखेर तब्बल १२ वर्षांनंतर अपयशी ठरत गुंडाळण्यात आली असून, योजनेसाठी शिल्लक राहिलेले तब्बल २२ कोटी ७३ लाख रुपये शासनाकडे परत जमा करण्याची नामुष्की पालिकेवर ओढवली आहे. या प्रकरणी योजनेच्या अपयशाची जबाबदारी निश्चित करून चौकशी समिती नेमण्याची मागणी भाजप नेते श्रीनिवास बिहाणी यांनी केली आहे.
पालिकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात बुधवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत भुयारी गटार योजनेचा मुद्दा चर्चेचा केंद्रबिंदू ठरला. यावेळी नगराध्यक्ष करण ससाणे यांनी योजनेचे उर्वरित निधी शासनाला परत करावे लागत असल्याची माहिती सभागृहात दिली.
मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांनी सांगितले की, योजनेच्या खात्यावर सध्या २२ कोटी ७३ लाख रुपये शिल्लक असून त्यामध्ये पालिकेच्या १४ व्या वित्त आयोगातील निधीचाही समावेश आहे. या रकमेतील पालिकेचा हिस्सा परत मिळण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
भाजप नेते श्रीनिवास बिहाणी यांनी या योजनेवर कोट्यवधी रुपये खर्च होऊनही काम पूर्ण झाले नसल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच या अपयशाला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांची व संबंधितांची चौकशी करून जबाबदारी निश्चित करण्यासाठी शासनाने विशेष समिती नेमावी, अशी मागणी त्यांनी केली.
सभेमध्ये भाजपचे आशिष धनवटे, संजय गांगड, शिवसेना (शिंदे गट)चे आकाश बेग, भाजपच्या स्नेहल खोरे, मंजुश्री मुरकुटे तसेच काँग्रेसचे मुजफ्फर शेख, राजेंद्र पवार आणि दिलीप नागरे यांनी विविध विषयांवर चर्चा केली.
दरम्यान, शहरातील प्रस्तावित भाजी मंडईच्या विकासाचा मुद्दाही सभेत उपस्थित झाला. चार वर्षांपूर्वी भाजी मंडईच्या दुरुस्तीसाठी सुमारे ७० लाख रुपये खर्च करण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात कोणतेही भरीव काम झाले नसल्याचे निदर्शनास आणून देत बिहाणी यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
