चिंचणी, ता. कडेगाव | प्रतिनिधी
चिंचणी (ता. कडेगाव, जि. सांगली) येथील ज्येष्ठ शिक्षिका व समाजप्रबोधनकर्त्या सौ. विमल बबनराव निकम यांना ग्रामपंचायत चिंचणीच्या वतीने प्रतिष्ठेचा ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.
हा पुरस्कार माजी पंचायत समिती सदस्या सौ. वैशालीताई कदम यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी चिंचणी गावचे लोकनियुक्त सरपंच रमेश मदने, उपसरपंच रवी पाटील तसेच गावातील मान्यवर, ग्रामस्थ आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सौ. विमल निकम यांनी शिक्षण क्षेत्रात अनेक वर्षे कार्य करत विद्यार्थ्यांच्या जीवनाला योग्य दिशा देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, संस्कार, आत्मविश्वास आणि सामाजिक जाणीव निर्माण करण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. त्यांच्या अध्यापनातून अनेक विद्यार्थी घडले असून समाजात विविध क्षेत्रांत यशस्वीपणे कार्यरत आहेत.
निवृत्तीनंतरही त्यांनी सामाजिक कार्याची परंपरा कायम ठेवत महिला सक्षमीकरण, समाजप्रबोधन आणि सामाजिक जागृतीसाठी उल्लेखनीय योगदान दिले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत ग्रामपंचायत चिंचणीच्या वतीने त्यांना ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले.
पुरस्कार स्वीकारताना सौ. विमल निकम यांनी गावकऱ्यांचे आभार मानत, “शिक्षण आणि संस्कार हीच समाज परिवर्तनाची खरी ताकद आहे,” असे मत व्यक्त केले.
त्यांच्या या गौरवाबद्दल ग्रामस्थांनी आनंद व्यक्त करत अभिनंदनाचा वर्षाव केला.
