पंढरपूर | प्रतिनिधी
पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसंदर्भात महावितरणच्या विरोधात आज तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा माननीय अभिजित आबा पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने शेतकरी व विविध शेतकरी संघटनांच्या उपस्थितीत पार पडला.
महावितरणच्या भोंगळ आणि मनमानी कारभाराविरोधात आंदोलनकर्त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. यावेळी शेतकऱ्यांनी सांगितले की, पूर्वी मिळणारा सहा तासांचा थ्री-फेज वीजपुरवठा आता केवळ पाच तासांवर आणण्यात आला असून, तोही सतत लपंडाव खेळत आहे. अचानक वीज खंडित होत असल्यामुळे पंढरपूर तालुक्यातील उभ्या पिकांना मोठा फटका बसत असून अनेक पिके पाण्याअभावी जळण्याच्या स्थितीत आहेत.
आंदोलनस्थळी शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा मांडताना सरकारवर टीका केली. “हे सरकार शेतकऱ्यांना सावत्र लेकरांसारखी वागणूक देत आहे,” अशी भावना अनेकांनी व्यक्त केली. उन्हात तळपत मोठ्या संख्येने शेतकरी आणि विविध संघटनांचे पदाधिकारी आंदोलनात सहभागी झाले होते.
यावेळी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. आंदोलनकर्त्यांनी इशारा देताना सांगितले की, “दि. 23 पर्यंत वीजपुरवठा सुरळीत झाला नाही, तर संबंधित अधिकाऱ्यांना कार्यालयात कोंडून बाहेरून कुलूप लावण्यात येईल.”
या आंदोलनामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. प्रशासनाने शेतकऱ्यांच्या मागण्यांची दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
