सफाळे | दि. 20
गेल्या १५ दिवसांपासून तीव्र पाणीटंचाईने त्रस्त असलेल्या मांडे, टेंभीखोडावे तसेच विटी लाईन परिसरातील गावांना अखेर आगरी सेना आणि सामाजिक कार्यकर्ते निलेश गावड व प्रकाश भोईर यांच्या पुढाकारातून दिलासा मिळाला आहे. प्रशासनाकडून वारंवार मागणी करूनही कोणतीही दखल न घेतल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, या भागात गंभीर पाणीटंचाई निर्माण झाल्यानंतर स्थानिक ग्रामपंचायतीने प्रशासनाकडे टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची अधिकृत मागणी केली होती. मात्र, तब्बल १५ दिवस उलटूनही संबंधित अधिकाऱ्यांकडून कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत होत्या.
या पार्श्वभूमीवर आगरी सेना तसेच सामाजिक कार्यकर्ते निलेश गावड आणि प्रकाश भोईर यांनी तातडीने पुढाकार घेत स्वखर्चाने टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला. संकटसमयी मदतीला धावून आल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करत संबंधितांचे आभार मानले.
दरम्यान, प्रशासनाच्या निष्काळजी कारभारावर नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “जनतेच्या मूलभूत गरजांकडे दुर्लक्ष करून प्रशासन केवळ कागदोपत्री काम करत आहे,” असा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
या घटनेमुळे ग्रामीण भागातील पाणीटंचाईचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून प्रशासनाने तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
