जळकोट | प्रतिनिधी
जळकोट तालुक्यात २२ जून रोजी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सलग चार तास कोसळलेल्या ढगफुटीसदृश्य पावसासह वादळी वाऱ्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील सुपीक माती वाहून गेली असून शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.
तालुक्यातील विविध भागांत शेतातील बांध कोसळले असून अनेक ठिकाणी शेती खडेमय झाली आहे. त्यामुळे आगामी पिकांच्या लागवडीसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. शेतकऱ्यांनी केलेली मशागत आणि शेतीसाठी केलेला खर्च पावसामुळे वाया गेल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.
अनेक शेतांमध्ये सुपीक माती वाहून गेल्यामुळे जमिनीची उत्पादन क्षमता कमी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे बाधित शेतकऱ्यांना तातडीने दिलासा देण्याची मागणी जोर धरत आहे.
नुकसानीचे तात्काळ सर्वेक्षण करून पंचनामे करण्यात यावेत तसेच बाधित शेतकऱ्यांना शासनाकडून आर्थिक मदत जाहीर करण्यात यावी, अशी मागणी जळकोट तालुक्यातील शेतकरी वर्गातून मोठ्या प्रमाणात होत आहे.
शासनाने आणि कृषी विभागाने परिस्थितीची गांभीर्याने दखल घेऊन लवकरात लवकर मदत जाहीर करावी, अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.
