श्रीरामपूर (प्रतिनिधी) :
श्रीरामपूर शहरातील आठवडे बाजार परिसरात मोबाईल चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी तातडीने तपास करून आरोपींना अटक करण्यात यावी, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विशाल खैरे यांना दिलेल्या निवेदनात, दोन महिन्यांपूर्वी आठवडे बाजारातून ज्येष्ठ पत्रकार मनोज आगे यांचा मोबाईल चोरीला गेल्याचे नमूद करण्यात आले आहे. मात्र, अद्याप या घटनेचा तपास लागलेला नसल्याची खंत व्यक्त करण्यात आली.
दरम्यान, शुक्रवारी पुन्हा एक चोरीची घटना घडली. याच दिवशी सुभाष त्रिभुवन यांचा मोबाईल चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या चोरट्याला त्यांनी रंगेहाथ पकडले. मात्र, गर्दीचा फायदा घेत संशयिताने मोबाईल खाली टाकून घटनास्थळावरून पळ काढला. संबंधित संशयिताचा फोटो पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, दर शुक्रवारी आठवडे बाजारात खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांचे सरासरी चार ते पाच मोबाईल चोरीला जात आहेत. त्यामुळे बाजारात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, मोबाईल चोरी करणारी टोळी आणि चोरीचे मोबाईल विक्री करणाऱ्या संशयितांचा तातडीने शोध घेऊन कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
यावेळी मनोज आगे, मर्चंट असोसिएशन चे संचालक गौतम उपाध्ये आदी उपस्थित होते.
