अक्कलकोट, दि. २५ :
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) चे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष सैदप्पा झळकी यांनी अक्कलकोट तालुक्यातील गांधीनगर सोळसे तांडा प्राथमिक आरोग्य केंद्र येथे पिण्याच्या पाण्याची कोणतीही सुविधा नसल्याने रुग्णांचे हाल होत असल्याचा गंभीर मुद्दा उपस्थित केला आहे. यासंदर्भात त्यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन देत ७ दिवसांत पाणीपुरवठा सुरू करण्याचा अल्टिमेटम दिला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दुधनी प्राथमिक आरोग्य केंद्र गेल्या अनेक महिन्यांपासून बंद असल्याने दुधनी, भीमनगर, शिवाजीनगर, म्हेत्रे नगर तांडा तसेच सिन्नूर परिसरातील १० ते १२ गावांतील नागरिकांना उपचारासाठी गांधीनगर सोळसे तांडा येथील आरोग्य केंद्रावर अवलंबून राहावे लागत आहे. मात्र येथे पिण्याच्या पाण्याचीच व्यवस्था नसल्याने रुग्ण, गरोदर महिला, लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
“रुग्णालय हे जीवनदायी केंद्र असते. तिथेच मूलभूत सुविधा नसणे हे प्रशासनाचे मोठे अपयश आहे,” अशी टीका सैदप्पा झळकी यांनी केली. दलित वस्ती सुधार योजनेतील निधीतून या समस्येचे तातडीने निराकरण करावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
रिपाइंच्या वतीने रुग्णालयात तातडीने RO प्लांट, ५००० लिटर क्षमतेची पाण्याची टाकी बसविणे तसेच कायमस्वरूपी नळ पाणीपुरवठा योजना सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, “७ दिवसांत प्रत्यक्ष काम सुरू न झाल्यास प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर तीव्र ‘हंडा मोर्चा’ काढण्यात येईल,” असा इशारा रिपाइंकडून देण्यात आला आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा आरोग्य अधिकारी, गटविकास अधिकारी आणि तहसीलदार यांनाही देण्यात आल्या आहेत.
