प्रश्न विचारणं गुन्हा असेल, तर होय… आम्ही पत्रकार गुन्हेगार आहोत!
सत्याचा शोध घेणं, सत्तेला प्रश्न विचारणं आणि जनतेचा आवाज बनणं हा आमचा गुन्हा असेल, तर हा गुन्हा आम्ही पुन्हा पुन्हा करू. कारण लोकशाहीत प्रश्न विचारणे हा अधिकार नसून कर्तव्य आहे. त्या कर्तव्याची किंमत जर धमक्या, दडपशाही किंवा जीव घेण्याच्या भाषेत मोजावी लागत असेल, तरी आम्ही मागे हटणार नाही.
Sanjay Patil यांनी पत्रकारांविषयी केलेले वक्तव्य केवळ निषेधार्ह नाही, तर लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर झालेला थेट हल्ला असल्याची भावना पत्रकार व सामाजिक क्षेत्रातून व्यक्त होत आहे. पत्रकारांना धमकावणे, त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करणे आणि प्रश्न विचारण्याच्या अधिकारालाच आव्हान देणे हे लोकशाही मूल्यांना धक्का देणारे कृत्य असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
“आम्ही विकले जाणारे नाही, वाकणारे नाही आणि कोणत्याही दबावाला झुकणारे नाही. आमच्या हातात तलवार नसली तरी लेखणी आहे, आणि हीच लेखणी सत्तेच्या अहंकाराचे मुखवटे फाडण्याचे सामर्थ्य ठेवते,” अशा शब्दांत पत्रकार बांधवांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली.
खासदार संजय पाटील यांच्या वक्तव्याची तात्काळ दखल घेऊन त्यांच्यावर कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात यावा, तसेच या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
“कायद्यापुढे कोणीही मोठा नाही. पद, सत्ता आणि प्रतिष्ठेपेक्षा संविधान आणि लोकशाही मूल्ये मोठी आहेत,” असेही निवेदनात नमूद करण्यात आले.
पत्रकारांना गप्प करण्याचा प्रयत्न म्हणजे लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न असून, लोकशाही आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी संघर्ष सुरूच राहील, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
