खटाव प्रतिनिधी :
मौजे निमसोड येथे स्मार्ट मीटर बसवण्याच्या प्रक्रियेदरम्यान बेकायदेशीर सक्ती, दमदाटी आणि नियमबाह्य वर्तणूक करण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. याबाबत महावितरण कंपनीचे ज्युनिअर इंजिनिअर एस. आर. पवार तसेच त्यांचे सहकारी कर्मचारी बजरंग माने आणि अदानी एनर्जी सोल्युशन लिमिटेडच्या वतीने रिद्धी कॉर्पोरेट सर्विसेसमार्फत कार्यरत शिवम नामदेव पाटोळे व संग्राम मोहिते यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, स्मार्ट मीटर बसवताना संबंधितांकडून नागरिकांवर दबाव टाकण्यात येत असून काही ठिकाणी दमदाटीची भाषा वापरली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामुळे ग्रामस्थांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या प्रकरणी ग्रामस्थांनी विशेष कार्यकारी अभियंत्याकडे लेखी तक्रार सादर करून संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करावी तसेच योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.
दरम्यान, या तक्रारीनंतर संबंधित विभागाकडून काय भूमिका घेतली जाते याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
