दोडामार्ग | प्रतिनिधी
दोडामार्ग येथील ख्रिस्ती बांधवांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी सुरू केलेले बेमुदत उपोषण तिसऱ्या दिवशीही सुरू असून, प्रशासनाच्या उदासीन भूमिकेमुळे आंदोलनस्थळी संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. आंदोलन सुरू होऊन तीन दिवस उलटूनही महसूल विभागाचा एकही जबाबदार अधिकारी उपोषणकर्त्यांची भेट घेण्यासाठी न आल्याने आंदोलनकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
प्रशासनाच्या या भूमिकेचा निषेध करत बहुजन समाज पार्टीचे जिल्हा महासचिव दीपक जाधव यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. “तीन दिवस उलटून गेले तरी महसूल विभागाचा एकही अधिकारी आंदोलनस्थळी फिरकलेला नाही, ही अत्यंत गंभीर बाब आहे. प्रशासन एवढ्या कोणत्या महत्त्वाच्या कामात व्यस्त आहे की त्यांना उपोषणकर्त्यांच्या समस्या ऐकण्यासाठी वेळ मिळत नाही?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
यावेळी त्यांनी राजकीय नेत्यांवरही टीका केली. “निवडणुकीच्या काळात मतांसाठी वारंवार जनतेच्या दारात येणारे पुढारी आता कुठे गेले आहेत? ते फक्त पुढील निवडणुकीची वाट पाहत आहेत का?” असा टोला त्यांनी लगावला.
ख्रिस्ती बांधवांच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष होत असल्याची खंत व्यक्त करताना दीपक जाधव म्हणाले, “आम्ही अल्पसंख्यांक असल्यामुळे आम्हाला या देशात न्याय मिळणार की नाही, हे प्रशासनाने स्पष्ट करावे.”
तसेच प्रशासनाने तातडीने आंदोलनाची दखल घेऊन उपोषणकर्त्यांशी संवाद साधावा, अन्यथा बसपा अधिक आक्रमक भूमिका घेईल, असा इशाराही त्यांनी दिला. “जर प्रशासनाने सकारात्मक पाऊल उचलले नाही, तर आम्ही स्वतः रस्त्यावर उतरून आंदोलन तीव्र करू,” असे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, आंदोलनस्थळी ख्रिस्ती बांधव मोठ्या संख्येने उपस्थित असून प्रशासनाच्या भूमिकेविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. आता प्रशासन उपोषणकर्त्यांशी चर्चा करून तोडगा काढणार की आंदोलन आणखी चिघळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
