

डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या महास्वच्छता अभियान कार्यक्रमांतर्गत रविवारी तळेरे बसस्थानक परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
तळेरे.
डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंतीनिमित्त डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्यावतीने हाती घेतलेल्या देशव्यापी स्वच्छता अभियान कार्यक्रम रविवारी सकाळी जिल्ह्यात विविध ठिकाणांसह संपूर्ण भारत भर राबविण्यात आला. याच स्वच्छता अभियाना अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील चिवला बिच समुद्रकिनारा, मालवण, कासार्डे येथील श्री महालक्ष्मी मंदीर व श्री विठ्ठलादेवी मंदीर परिसर, तळेरे बसस्थानक, पंचायत समिती वैभववाडी, पी. एच. सी. फोंडाघाट, एस.टी.स्टॅंड कणकवली, पिंगुळी तिठा रस्ता, निमूसगा ते लाईट हाऊस रस्ता, सावंतवाडी उपजिल्हा रूग्णालय, कुणकेश्वर मंदीर परिसर व रस्ता या सर्व ठिकाणी स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी श्रीसदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या विविध समाजोपयोगी उपक्रमामुळे या प्रतिष्ठानचे कार्य संपूर्ण जगभरात पोहचले आहे. या प्रतिष्ठानच्या माध्यमातून वेळोवेळी विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात. यामध्ये रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, वृक्षारोपण व संवर्धन, विहिरी नद्या साफसफाई, जल पुनर्भरण, पाणपोई, बंधारा उपक्रम, शैक्षणिक साहित्य वाटप व स्वच्छता अभियान असे अनेक समाजपयोगी उपक्रम राबविण्यात येतात. याचीच दखल घेऊन महाराष्ट्राचे राज्यपाल यांनी डॉ.श्री.दत्तात्रेय नारायण तथा आप्पासाहेब धर्माधिकारी यांना स्वच्छ भारत अभियानाचे “स्वच्छतादूत” म्हणून नियुक्त केले.
आपल्यावर या मातृभूमिचे या देशाचे तसेच या समाजाचे ऋण आहेत. ते ऋण फेडण्यासाठी प्रत्येकाने सेवा भाव अंतरी रुजू केला पाहिजे आणि याच श्रीसेवेतून या ऋणातून मुक्तता होईल. यासाठी डॉ. श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान संपूर्ण देशभर तसेच देशाबाहेर स्वच्छतेचा जागर करत आहेत.
या अभियाना अंतर्गत या १० ठिकाणावर एकूण २३७६ श्रीसदस्य उपस्थित होते व अंदाजित ८१ टन कचरा संग्रहित करून 39500 चौ. मी. परिसर, 10 कि.मी. दुतर्फा रस्ता व २ कि.मी.समुद्रकिनारा पूर्णतः स्वच्छ करण्यात आला. या कार्यक्रमामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व सरकारी कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी वर्ग यांचे सहकार्य लाभले.
या कार्यामागे साहजिकच डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे अध्यक्ष पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी व डॉ. सचिनदादा धर्माधिकारी यांचे मार्गदर्शन, त्यांनी दिलेले विचार आणि सामाजिक सेवेचा वसा व प्रेरणाशक्ती निश्चितच कारणीभूत आहे.
Discussion about this post