परभणी प्रतिनिधी :- रमेश मुलगीर
जातीपातीच्या भिंतींमध्ये आपण अनेकदा अडकून पडतो; पोटजातींसाठीही भटकतो. पण प्रत्येक जातीचं पोट एकच असतं, ही साधी जाणीव काआपण विसरतो. मात्र “शेतकरी” या कष्टकरी जातीसाठी आपण कितीदा एकत्र आलो आहोत, हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारण्याची वेळ आली आहे. ज्या मातीत आपण जन्मलो, वाढलो, त्या मातीतल्या लोकांचं भलं व्हावं म्हणून अनेकजण आयुष्य झिजवतात; पण त्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण क्वचितच एकत्र येतो.
गेल्या वर्षी बनवस येथे मा. अॅड. अजित काळे यांचा सत्कार करण्यात आला होता. त्यावेळी 2020 च्या खरीप व रब्बी पिकविमा रखडल्याच्या प्रश्नावर चर्चा झाली होती. तब्बल 2-3 वर्षे न्यायालयीन लढाई मोफत लढून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी अजित काळे साहेबांनी मोठे योगदान दिले. या लढ्यात त्यांना हेमचंद्र भाऊ यांनी खंबीर साथ दिली.
या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे न्यायालयाचा निकाल शेतकऱ्यांच्या बाजूने लागला आणि सुमारे 80 कोटी रुपयांची रक्कम शेतकऱ्यांना मिळाली. हा विजय केवळ आर्थिक नव्हता, तर शेतकऱ्यांच्या हक्कांचा सन्मान होता. यात अजित काळे साहेब व हेमचंद्र भाऊ यांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे.
त्यांच्या या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दि. 7 मार्च रोजी मौजे शेळगाव, ता. सोनपेठ येथे आयोजित सत्कार सोहळ्यास सर्वांनी तन, मन, धनाने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात येत आहे. येणाऱ्या काळात शेतीसमोर अनेक आव्हाने उभी आहेत. त्यांचा ठामपणे सामना करायचा असेल, तर अशा त्यागी आणि लढवय्या व्यक्ती आपल्या सोबत असणे गरजेचे आहे.
आमंत्रणाची वाट न पाहता, मिळेल त्या मार्गाने या सत्कार सोहळ्यास उपस्थित राहून कृतज्ञता व्यक्त करूया.










