प्रतिनिधी – नाना साबळे
धोंदलगाव
शिवना टाकळी मध्यम प्रकल्पातील पाटाचे पाणी धोंदलगावपर्यंत का येत नाही, याबाबत येथील तरुणांनी प्रत्यक्ष पाहणी करून प्रश्न उपस्थित केला आहे. पाण्याचा लाभ खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत नसल्याची खंत व्यक्त करत तरुणांनी शासनाचे लक्ष वेधले आहे.
बाभुळगाव शिवारात पाहणी करताना मुख्य पाटावर ओव्हरफ्लो व सर्क्युलेशनसाठी काढण्यात आलेला मार्ग पूर्णपणे मोकळा करण्यात आल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी ढेकू नदी पात्रात वळविले जात असल्याचे आढळले. परिणामी नदीकाठच्या शेतकऱ्यांना काही प्रमाणात फायदा होत असला, तरी धोंदलगावसह परिसरातील अनेक शेतकरी मात्र या पाण्यापासून वंचित राहत आहेत.
धोंदलगाव परिसरातील मोठ्या प्रमाणातील जमीन आजही कोरडवाहू स्वरूपाची आहे. अनेक शेतांतून पाट-चारी गेलेली असतानाही प्रत्यक्षात पाण्याचा लाभ मिळत नसल्याची नाराजी व्यक्त होत आहे. यासाठी स्थानिक तरुणांनी एकत्र येत पाठपुरावा सुरू केला असून, त्यांचा हा प्रयत्न उल्लेखनीय मानला जात आहे.
‘धोंदलगाव स्मारक ग्रुप’च्या माध्यमातून १०२४ शेतकरी जोडले गेले असले तरी पाहणीवेळी आठ ते नऊ तरुण व शेतकरी उपस्थित होते. “धोंदलगावला पाणी मिळालेच पाहिजे” हा त्यांचा एकमुखी निर्धार आहे.
धुलिवंदनाच्या दिवशी सकाळी १० वाजता विठ्ठल रुक्मिणी मंदिर, धोंदलगाव येथे बैठक पार पडली. यानंतरही शासनाने, विशेषतः पाटबंधारे विभागाने, या प्रश्नाकडे लक्ष न दिल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा स्थानिक तरुण शेतकरी व नागरिकांनी दिला आहे.







