**हेडलाईन :****“प्रशासन झोपेत, विद्यार्थी उन्हात!” – आर्णीत शाळा सकाळ पाळीसाठी मनसेचा टोला****आर्णी प्रतिनिधी :**मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच उष्णतेचा पारा झपाट्याने वाढत असून सकाळीच तापमान 36 अंश सेल्सियसपर्यंत पोहोचत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र या गंभीर परिस्थितीकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आर्णीत प्रशासनावर जोरदार टोला लगावला आहे.याबाबत मनसे पदाधिकाऱ्यांनी गटशिक्षण अधिकारी, आर्णी यांना निवेदन देऊन तालुक्यातील तसेच शहरातील सर्व खाजगी शाळा तात्काळ सकाळच्या पाळीत घेण्याबाबत आदेश द्यावेत, अशी मागणी केली. वाढत्या उष्णतेमुळे दुपारच्या वेळेत शाळा भरल्याने विद्यार्थ्यांना तीव्र उकाड्याचा सामना करावा लागत आहे, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.दरवर्षी जिल्हा परिषद शाळांमध्ये 20 मार्चपासून सकाळची पाळी सुरू केली जाते. मात्र यंदा उष्णतेची तीव्रता लवकर वाढल्यामुळे विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून हा निर्णय तात्काळ लागू करावा, अशी मागणी मनसेने केली आहे. तसेच शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची योग्य व्यवस्था करावी, अशीही सूचना करण्यात आली.प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून त्वरित निर्णय घ्यावा, अन्यथा विद्यार्थ्यांच्या हितासाठी मनसेच्या वतीने तीव्र आंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.या वेळी मनसेचे उपजिल्हाप्रमुख सचिन यलगंधेवार शहराध्यक्ष कपिल ठाकरे व तालुकाध्यक्ष आकाश माटलवाड, गौरव बाबरे, अभि सपाटे, अजय पिकलमुंडे, धीरज कोडापे, स्वप्नील काईट, गोपाल रेहपाडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.






