जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सांगली-मिरज-कुपवाड शहर महानगरपालिकेच्या महिला बालविकास विभागामार्फत आज मिरज येथील बालगंधर्व नाट्यगृहात भव्य सोहळा संपन्न झाला. “हक्क, न्याय आणि कृती” या संकल्पनेवर आधारित या कार्यक्रमात महानगरपालिकेच्या विविध विभागांतील महिला अधिकारी, कर्मचारी आणि आशा वर्कर यांचा सन्मान करण्यात आला. सदर कार्यक्रमाचे उद्घाटन महापौर श्री. धीरज सूर्यवंशी यांच्या हस्ते आणि आयुक्त श्री. सत्यम गांधी (भा.प्र.से.) यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.प्रशासकीय सेवा, शिक्षण, आरोग्य आणि स्वच्छता क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते ‘महिला गौरव पुरस्कार’ देऊन सन्मान करण्यात आला. यामध्ये शिक्षिका, आरोग्य सेवक, आशा वर्कर आणि ॲडव्हान्स ब्युटी पार्लर प्रशिक्षणार्थींचा समावेश होता.केवळ सन्मानच नव्हे, तर महिलांच्या सक्षमीकरणासाठी दोन महत्त्वाची प्रबोधन सत्रे आयोजित करण्यात आली होती:मिरज पंचायत समितीच्या रिसोर्स पर्सन मा. रूपाली चोथे यांनी ‘तणाव व्यवस्थापन’ या विषयावर मार्गदर्शन करताना, नोकरी आणि कुटुंब यांचा समतोल कसा साधावा, याचे प्रभावी तंत्र मांडले.वैद्यकीय आरोग्य अधिकारी मा. सुचेता पवार यांनी स्त्रियांचे आरोग्य, बदलणारे हार्मोन्स आणि संतुलित आहार यावर सविस्तर जनजागृती केली.कार्यक्रमात मनोरंजनासोबतच ज्ञानाची जोड देण्यात आली होती. आरोग्य विभागाच्या श्रीमती मीनाक्षी गायकवाड आणि श्रीमती माधुरी पाटील यांनी घेतलेल्या प्रश्नमंजुषा कार्यक्रमात महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. तसेच महिला कर्मचाऱ्यांनी सादर केलेल्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी सोहळ्याची रंगत वाढवली.यावेळी बोलताना महापौर धीरज सूर्यवंशी म्हणाले की, “महानगरपालिकेचा डोलारा पेलण्यात महिला कर्मचाऱ्यांचा वाटा ५० टक्क्यांहून अधिक आहे. त्यांचा सन्मान करणे हे आमचे कर्तव्य आहे.”
आयुक्त सत्यम गांधी यांनी आपल्या भाषणात महिलांच्या कामातील चिकाटीचे कौतुक केले आणि प्रशासनात महिलांना सुरक्षित व पोषक वातावरण देण्याची ग्वाही दिली.या सोहळ्यास उपमहापौर गजानन मगदूम, सभागृह नेता संदीप आवटी, विरोधी पक्ष नेता मंगेश चव्हाण, अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, उपायुक्त स्मृती पाटील, उपायुक्त अश्विनी पाटील यांसह सर्व पदाधिकारी, सदस्य आणि मोठ्या संख्येने महिला कर्मचारी उपस्थित होत्या.








