रिसोड (प्रतिनिधी) : रिसोड शहरात वीज वितरण विभागाकडून स्मार्ट मीटर बसविण्याचे काम सुरू झाले असून काही भागांमध्ये हे मीटर बसविण्यात आले आहेत. मात्र, काही ठिकाणी अजूनही मीटर बसविण्यात आले नसल्याने नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केला जात आहे.
स्मार्ट मीटर योजनेचा नेमका फायदा काय, असा सवाल नागरिकांकडून केला जात आहे. बिल वेळेवर न भरल्यास थेट वीजपुरवठा खंडित होणार असल्याने सर्वसामान्य नागरिक, शेतकरी आणि मजूर वर्गात चिंतेचे वातावरण आहे.
शहरात रोजंदारीची कमतरता, शेतीमालाला योग्य भाव न मिळणे यामुळे आर्थिक अडचणीत असलेल्या नागरिकांना स्मार्ट मीटरमुळे अधिक अडचणी निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या योजनेबाबत सविस्तर माहिती देऊन नागरिकांच्या समस्या सोडवाव्यात, अशी मागणी होत आहे.









